श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
सरकारी नोकरदार, बागायती शेती असणारे, खाजगी क्षेत्रातील मोठे पगारदार तसेच आर्थिक सक्षम असणार्या सधन व्यक्तींनी अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणे बंद करावे, सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीमती माळी यांनी म्हटले आहे की, शासनाने फेब्रुवारी 2014 पासून अन्न सुरक्षा योजनेंतर्गत विहित अटीनुसार पात्र असलेल्या अंत्योदय लाभार्थ्यांना 35 किलो व प्राधान्य कुटुंब असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याची योजना सुरु केली. त्यावेळी अनेक सधन व्यक्तींनी या योजनेकरीता अर्ज करुन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला आहे. ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे अनेक गरजू लाभार्थी आजही या योजनेपासून वंचित राहीले आहेत. गरजू लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी सधन व्यक्तींनी अनुदानातून बाहेर पडावे. या योजनेचा अजर्र् तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, संबधीत स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
समाजातील सधन व्यक्ती तसेच ज्यांना सवलतीच्या धान्याची गरज नाही, अशा व्यक्तीनी अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडावे. जेणे करुन ख़र्या व गरजुंना सवलतीच्या धान्याचा लाभ देता येईल, यानंतरही सधन व्यक्तींनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून घेतलेल्या धान्याचे बाजारभावापेक्षा दुप्पट दराने वसुली केली जाईल, त्यामुळे कारवाई सुरु होण्याआगोदरच सधन व्यक्तींनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणे बंद करावे, असे आवाहन माळी यांनी केले आहे.