मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक खेळाडू केदार जाधव याने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय विचारांती घेतल्याचे सांगत मंगळवारी त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी केदार जाधवला भाजपाचे सदस्यत्व दिले.
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केदार जाधव याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रमुख नेत्यांनी भाजपचे उपरणे गळ्यात घालून केदारचे पक्षात स्वागत केले. पक्षासाठी आणि जनतेसाठी चांगले काम करा, अशा शुभेच्छा बावनकुळे यांनी केदार जाधवला दिल्या. यावेळी भाजपकडून महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मी प्रभावित झालो, असे सांगून भाजप प्रवेशाच्या मागचे गुपीत केदारने सांगितले.
“२०१४ पासून, जेव्हापासून केंद्रात भाजप सरकार सत्तेत आले आहे त्यांना मिळालेले प्रेम आणि पाठिंबा तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी जे काही छोटे योगदान देता येईल ते करणे आहे. मला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे केदार जाधव म्हणाला.
केदार जाधव आणि रोहित पवार यांच्या जवळीकतेची देखील वारंवार चर्चा व्हायची. महाराष्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये एकत्रित काम करताना दोघांच्या अनेक वेळा भेटी व्हायच्या. त्यामुळे केदारचा राष्ट्रवादीकडे देखील ओढा असल्याचे बोलले गेले. परंतु आज केदारने भाजपमध्ये प्रवेश करून त्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली असे म्हणावे लागेल.
केदार जाधवची क्रिकेटची कारकिर्द
केदार जाधवने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण नोव्हेंबर २०१४ मध्ये रांची येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून केले. त्यावेळी एमएस धोनी हा कर्णधार होता. त्यानंतर त्याने २०१४ ते २०२० पर्यंत भारतासाठी ७३ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांत त्याने ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या. यादरम्यान, दोन शतके आणि सहा अर्धशतके फटकावली. तर तसेच अर्धवेळ गोलंदाजी करताना ५.१५ च्या इकॉनॉमीने २७ विकेट्स घेतल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तो फक्त एक अर्धशतक करू शकला. २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्याने पाच वेगवेगळ्या संघांसाठी आपली ताकद दाखवली. ९५ आयपीएल सामन्यांपैकी ८१ डावात १२०८ धावा केल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा