औरंगाबाद – aurangabad
मोत्याची शेती (Pearl farming) प्रकरणी तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अटकेत असलेल्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यात सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्याशिवाय अटकपूर्व जामीनावर निर्णय घेतला जाणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात इंडो-पर्ल कंपनीचा मालक अरुण नागराव अंभोरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि.७) सुनावणी ठेवण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनी दीपक लोखंडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागून घेतला. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्याशिवाय अटकपूर्व जामिनावर निर्णय घेतला जाणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
अरूण नागराव अंभोरे (रा. बुलढाणा) यांनी मोत्याची शेती, शिंपले संवर्धनाचे अमिष दाखवून करमाड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लाडसावंगी, सय्यदपुर, चारठा, सेलूद, जयपूर, पिंप्रीराजा आणि इतर गावच्या शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. शेतकऱ्यांना शिंपल्याच्या शेतीसाठी त्यांच्याकडून शिंपल्याचे बिजापोटी काही लाख रुपयांची रक्कम जमा करून घेतली. त्यानंतर तेरा महिन्यांचा करार केला. जिवंत राहिलेल्या शिंपल्याचे प्रतिनग १८० रुपये प्रमाणे रक्कम देण्याचा लेखी करार केला.
शेतकऱ्यांना धनादेश दिले. परंतु संबंधित धनादेश वटले नाही. अंभोरेवर शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून भांदवि ४२० व ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांच्या वतीने म्हणणे मांडताना संबधित गुन्ह्याची व्याप्ती राज्य आणि राज्याबाहेर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शेतकऱ्यांच्या वतीने अँड. उमेश मोटे, अँड. के. एन. शेरमाळे आदींनी बाजू मांडली.