अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी संजीवनी ठरेल असे अपेक्षा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. तसेच साखळाई पाणी योजनेच्या 1 हजार 800 कोटी रुपये खर्चाच्या कामास मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्या वतीने नगर शहरातील पुणे रस्त्यावरील केडगाव औद्योगिक वसाहतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय कृषी महोत्सव-कृषीपर्वाचे उद्घाटन पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सचिव स्वामी विद्यानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या 30 हजार 112 बचत गट कार्यरत असून त्यांना आतापर्यंत 1 हजारांचा 500 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात आला आहे. बचत गट त्याची 100 टक्के परतफेड करून उत्तम काम करत आहेत, असाही गौरव पालकमंत्र्यांनी केला. लाडक्या बहिणीप्रमाणे शेतकर्यांच्या पाठीशीही सरकार उभे असल्याची हमी त्यांनी दिली. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांना भरपाई दिल्याचा दावाही त्यांनी केला.
आमदार जगताप, जिल्हाधिकारी डॉ. आशिया, स्वामी विज्ञानंद यांची भाषणे झाली. सीईओ आनंद भंडारी यांनी बेचत गटांच्या उत्पादन विक्रीच्या साईज्योती महोत्सवाची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी स्वागत व प्रस्तावित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या व्हाट्सअप चॅटबोट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. विविध पुरस्कार प्राप्त शेतकर्यांचा गौरव करण्यात आला. पहिल्या दिवसापासून महोत्सवास नागरिकांनी प्रतिसाद दिला. महोत्सवात 500 हून अधिक स्टॉल्स आहेत. खाद्य पदार्थ विक्री स्टॉलभोवती खव्वैय्यांनी गर्दी केली होती. महोत्सव 9 पर्यंत सुरू आहे.
शेतकरी व बचत गटांच्या सहलींना निधी
जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकर्यांनी इतर राज्यात, देशभरात जाऊन शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पहावेत, बचत गटांनीही बाहेर राज्यात जाऊन उत्पादन, त्याची विक्री याची माहिती घ्यावी. यासाठी सहली आयोजित कराव्यात, जिल्हाधिकारी डॉ. आशिया व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी त्याचा आराखडा तयार करावा. आपण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ, असेही पालकमंत्री विखे यांनी जाहीर केले.
केंद्र व राज्य शासन शेतकर्यांच्या हितासाठी सातत्याने निर्णय घेत आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये 8 लाख 25 हजार शेतकर्यांच्या खात्यावर 1 हजार 525 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे. शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत, जिल्ह्यात पुरस्कारप्राप्त शेतकरी व कृषी विद्यापीठातील विद्यार्थी यांना देशभरात कृषी क्षेत्रात होत असलेले बदल अभ्यासण्यासाठी सहलींचे आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.





