दिल्ली | Delhi
अनंत चतुर्दशी दिवशी शुक्रवारी देशभरात गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणुकांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एकीकडे आनंदाच्या बातम्या तर दुसरीकडे गणपती विसर्जनाच्या उत्सवाला गालबोट लागले.
देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना घडल्या असून १५ जणांनी जीव गमवला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहे. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्घटना घडल्या आहे.
हरियाणातील महेंद्रगढ येथील झगरोली कालव्यात गणेशमूर्तीसह आठ जण वाहून गेले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, सोनीपतमध्ये यमुना नदीत बुडून २ जणांचा मृत्यू झाला, तर २ अद्याप बेपत्ता आहेत.
उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. संत कबीर नगर येथील आमी नदीत गणपती विसर्जन करताना ४ मुलांचा बुडून मृत्यू, चौघेही भाऊ-बहीण होते. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ललितपूर आणि उन्नावमध्ये विसर्जनाच्या वेळी बुडून २-२ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पनवेलमधील कोळीवाडा येथे विसर्जन घाटावरती तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शॉक बसला आहे. जनरेटरमझील वायर तुटल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. सर्व जखमी भाविकांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.