मुंबई | Mumbai
गेल्या दोन वर्षांपासून बाप्पाच्या भेटीची आस लागलेल्या गणेश भक्तांची आज काळजी मिटली. तब्बल दोन वर्षानंतर भाविकांनी विघ्नहर्त्या गणरायाचं (Ganesh Chaturthi) जल्लोषात स्वागत केलं. ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं आगमन झालं.
जगभरात गणपती बाप्पाची वेगवेगळी नावं आहेत. भक्त बाप्पाला गजानन, विघ्नहर्ता, गणपती, एकदंत, सिद्धीविनायक, गणेशा आणि गौरी पुत्र या नावांनी संबोधतात. मात्र आपल्याला माहितीये का की, भगवान गणेशाच्या या वेगवेगळ्या नावांमागे कथा काय आहेत ते. आज जाणून घेऊया एकदंत नावामागे काय आहे कथा…
ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलं आहे की, एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्री रामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की, कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूळ दिलं होतं. जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच नाहीयेत.
फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे. ते आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते. मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला. जिथं भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्री राम कथा ऐकवत होते. जेव्हा गणेशानं भगवान शंकराचा त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले. त्यांनी गणेशाला आपला रस्त्या अडवू नकोस असं सांगितलं. नाहीतर युद्ध करण्याची चेतावनी दिली. गणपती बाप्पा मागे हटणारे नव्हते आणि त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं. या युद्धादरम्यान गणपती बाप्पाचा एक दात तुटला. त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं.
एकदंत असण्याची दुसरी कथा महाभारताच्या संदर्भाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या कथेनुसार, जेव्हा वेद व्यासांनी गणेशजींना महाभारत लिहिण्यासाठी आमंत्रित केले आणि मदत मागितली. तेव्हा गणेशजींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. जोपर्यंत वेद व्यास बोलत राहील तोपर्यंत गणेशजीं कथा लिहीत राहील. वेद व्यास बोलणे थांबवताच, भगवान गणेश त्याच वेळी महाभारत लिहिणे थांबवतील आणि निघून जातील. वेद व्यासांनी गणेशाचा हा मुद्दा मान्य केला. म्हणूनच गणेशजींनी त्यांचा एक दात तोडून पेन बनवला होता आणि त्यावरून संपूर्ण महाभारत लिहिले गेले होते.
गणेशाच्या एकदंत असण्याच्या तिसर्या कथेनुसार गणेशाचे गजमुखसुराशी युद्ध झाले. असे म्हणतात की, गजमुखसुर नावाच्या असुराने हा वरदान मिळवला होता की, तो कोणत्याही शस्त्राने मारला जाऊ शकणार नाही. यामुळे गजमुखासूर जवळजवळ अमर झाला. यामुळे तो निर्भय झाला आणि देव आणि मानवांना त्रास देऊ लागला. तेव्हा भगवान गणेशाने मानव आणि देवता वाचवण्यासाठी गजमुखासुराचा स्वतःच्या दाताने वध केला. यामुळे त्याला त्याचा एक दात गमवावा लागला आणि तो एकदंत झाला.
भाऊ कार्तिकेयशी संबंधित भविष्य पुराणातील कथेनुसार, श्रीगणेशाचा दात भाऊ कार्तिकेयमुळे तुटला होता. गणेशजींनी दात तोडल्याच्या कथेबद्दल असे सांगितले जाते की, लहानपणी गणेशजी अतिशय खोडकर स्वभावाचे होते, तर त्यांचा मोठा भाऊ कार्तिकेय हा अतिशय शांत स्वभावाचा होता. दोन्ही भावांच्या विपरीत स्वभावामुळे शिव आणि पार्वती खूप अस्वस्थ असायचे. असे म्हणतात की भगवान गणेश कार्तिकेयाला खूप त्रास देत असत. अशाच एका भांडणात कार्तिकेयाने गणपतीला धडा शिकवायचे ठरवले आणि त्याने गणपतीला मारहाण केली, त्यामुळे त्याचा एक दात गेला आणि तेव्हापासून गणपतीला एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले.