अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर- पाथर्डी रस्त्यावरील भिंगार मधील हॉटेल समाधानसमोर किरकोळ अपघाताच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. आयुष विकास साळवे (वय 18, रा. गवळीवाडा, भिंगार) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांनी जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. विकी गायकवाड, अक्षय गायकवाड, नीलेश शिंदे, गणेश पंडित, आकाश तांबे (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. भिमनगर, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी आयुष विकास साळवे यांच्या दुचाकीचा धक्का विकी गायकवाड याच्या दुचाकीला लागला.
याच क्षुल्लक कारणावरून विकी गायकवाड याने अक्षय गायकवाड, नीलेश शिंदे, गणेश पंडित आणि आकाश तांबे यांना बोलवून गैरकायदेशीर जमाव जमवला. या टोळक्याने फिर्यादीस शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात तसेच दगडाने पायावर व नाकावर मारून जखमी केले. जखमी साळवे यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक फौजदार रेवणनाथ दहिफळे करीत आहेत.





