बारामती | Baramati
बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतम अदानी आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आले होते. यावेळी गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
शरद पवार माझ्यासाठी आदर्श
बारामतीमधील ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या उद्घाटनावेळी अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह दोन्ही पक्षाचे अनेक नेते यावेळी एकत्र आले होते. यावेळी गौतम अदानी भाषणात म्हणाले की, मला गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शरद पवारांना जाणून घेण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. त्यांना सर्व क्षेत्रातील माहिती अधिक आहे. शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श आहेत असे अदाणी म्हणाले.
पवारांनी साध्य केले ते विकासाच्या पलीकडे आहे
गौतम अदाणी म्हणाले की, दीर्घकालीन राजकारणामध्ये शरद पवार यांनी खूप मोठे सामाजिक काम उभारले आहे. त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. त्यांची बुद्धिमता आणि सहानुभूती सर्वाधिक छाप पाडते. मी अनेक वेळा बारामतीला भेट दिली आणि शरद पवार यांनी येथे जे साध्य केले आहे ते विकासाच्या पलीकडे आहे. त्यांनी शेतीमध्ये परिवर्तन घडवले असून सहकारी संस्थांना बळ दिले. तसेच, उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आहे,” असे कौतुकोद्गार यावेळी काढले.
हे ही वाचा: दोन गुजराती गिळायला निघाले, पण…; उध्दव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका
असमान्य नेते
अदाणी पुढे असे ही म्हणाले, जगात अशी काही ठिकाणे असतात जी केवळ नकाशावरील एक बिंदू नसतात. तर प्रगती, बदल आणि संधींचे शक्तिकेंद्र म्हणून ही ठिकाणे ओळखली जातात. बारामती हे अशाच एका परिवर्तनाचे, अमर्याद शक्यता असलेले प्रतीक आहे, असे गौतम अदानी म्हणाले. तसेच बारामती शहराच्या विकासात शरद पवार यांच्या योगदानावविषयी बोलताना एक असामान्य नेते आणि माझे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांच्या दूरदृष्टीमुळे बारामती हे शहर अमर्याद शक्यतांचे प्रतिक आहे, असेही गौतम अदानी म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल उद्योजक गौतम अदानी म्हणाले की, “ज्याप्रमाणे औद्योगिक क्रांतीने जगाचा चेहरामोहरा बदलला, तसेच AI मानवी क्षमतांचा विस्तार करेल. पण, AI च्या क्षेत्रात भारत दुसऱ्या देशांच्या अल्गोरिदमवर अवलंबून राहू शकत नाही. जर आपल्याला जागतिक नेतृत्व करायचे असेल, तर आपली डेटा सुरक्षा तसेच निर्णयक्षमता आपल्याच हातात हवी.” असे ते म्हणाले. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे भविष्यात जोखमीचे ठरू शकते, असा इशाराही त्यांनी पुढे दिला.
उद्घाटन केलेल्या सेंटरबाबत ते म्हणाले की, “हे AI सेंटर शेती, आरोग्यसेवा आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणार आहे. AI आता भारताचा चौथा पाया बनणार आहे. AI भारताच्या विकासाच्या मार्गाला आकार देईल. AI महाराष्ट्राच्या विकासाला चालना देईल. भारताने जागतिक AI स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकले आहे. AI आता केवळ तांत्रिक शर्यत राहिलेली नाही, तर जागतिक वर्चस्वासाठीची स्पर्धा आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.




