मुंबई | प्रतिनिधी Mumbai
भारतीय जनता पक्ष ( BJP )शेतकरीविरोधी असून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही( Onion Rate) घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी आणि कांद्याला १ हजार ५०० रुपये हमी द्यावा अथवा क्विंटलला एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress State President Nana Patole ) यांनी केली.
कांद्याच्या मागणीत मोठी घट झाल्याने कांद्याचे दर घसरले आहेत. कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या राजवटीत शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही तर काही मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे उघड झाले आहे. उद्योगपतींचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना देण्यास भाजप सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका पटोले यांनी केली.
सध्या बाजारात कांद्याचे भाव घसरलेले आहेत. बाजारात कांद्याला ४०० ते ५०० दर मिळत आहे. या दरातून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. कांद्याचे घसरलेले भाव पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे, असेही पटोले म्हणाले.
शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना बाजारात भाव पडल्याने तो पुरता पिचला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या ५०० किलो कांद्याला एक रुपया किलोप्रमाणे भाव मिळाला. खर्चाची वजावट करुन केवळ २ रुपयांचा धनादेश त्या शेतकऱ्याच्या हातात पडला. ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे, असे सांगत कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला भाजप सरकारला तोंड द्यावे लागेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.