Saturday, July 27, 2024
Homeनगरगोदावरी कालव्यांचे 7 नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या - कोल्हे

गोदावरी कालव्यांचे 7 नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या – कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

जलसंपदा विभागाकडून गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांकडून पाण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत नमुना नंबर 7 मागणी अर्ज मागविण्यात आलेले आहेत; परंतु शेतकर्‍यांचे खरीप हंगामाचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी लाभधारक शेतकर्‍यांना 25 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव येथील गोदावरी डावा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता आणि राहाता येथील गोदावरी उजवा तट कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव व राहाता हे अवर्षणप्रवण तालुके आहेत. या दोन्ही तालुक्यांना दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. या पाण्यावरच या भागातील शेतकरी पिके घेतात. यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही.

सुरुवातीला आलेल्या जेमतेम पावसावर बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिकांची लागवड केली. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची संपूर्ण मदार गोदावरी कालव्यातून मिळणार्‍या पाण्यावरच आहे.

जलसंपदा विभागान शेतकर्‍यांकडून खरीप हंगाम सिंचनासाठी 7 नंबर द्वारे पाणी मागणी करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले आहेत. सध्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची खरीप हंगामाच्या नियोजनाची कामे सुरू आहेत. सद्य:स्थितीत शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या नियोजनात अडकल्याने अद्याप पाणी मागणी अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे लाभधारक शेतकर्‍यांना पाणी मागणी अर्ज सादर करण्यास 25 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी. जेणेकरून जास्तीत जास्त लाभधारक शेतकर्‍यांना अर्ज सादर करता येईल. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकर्‍यांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याबाबत संबंधितांना तात्काळ योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

सर्व शेतकरी बांधवांनी आपला पाणी मागणी हक्क 7 नंबर अर्ज जास्तीत जास्त संख्येने भरावे.ज्यामुळे आपल्याला मिळणारे पाणी हे कमी होणार नाही व त्यावरचा आपला हक्क अबाधित राहील.

स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

- Advertisment -

ताज्या बातम्या