चास नळी । वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून गोदावरी उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे (Lining) काम सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामामुळे भविष्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवेल, अशी भीती व्यक्त करत कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत हे काम प्रखर विरोधानंतर बंद पाडले आहे.
कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण केल्यास जमिनीतील नैसर्गिक पाझर पूर्णपणे थांबणार असून, यामुळे लाभक्षेत्रातील गावांच्या पाणीपुरवठा योजना विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, कमांड एरियामधील भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडतील आणि बागायती शेती उद्ध्वस्त होईल, असा संताप आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अत्यंत वेगाने सुरू असलेले हे काम थांबवण्यासाठी दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवत, जोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे पाटबंधारे विभागाच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला असून, परिसरातील वातावरण तापले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन अस्तरीकरणाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.




