नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
गोदावरी खोरे हे सर्वात मोठे व तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोर्यात आणण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपण सगळे मिळून हे काम करू आणि गोदावरी खोरे सुजलाम सुफलाम करू, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पैठण येथील जायकवाडी प्रकल्प येथे केले.
पैठण येथील नाथसागर जलाशयात (जायकवाडी धरण) पाण्याची पातळी वाढल्यामुळे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करुन नदीपात्रात पाणी विसर्ग सुरु करण्यात आला. नाथसागर जलाशय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास आ.रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. हिकमत उडान, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, अधीक्षक अभियंता प्रशांत संत, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, मुख्य अभियंता अरुण नाईक, मुख्य अभियंता राजीव मुंदडा, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, शाखा अभियंता मंगेश शेलार, तहसिलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे आदी उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना ना. विखे पाटील म्हणाले की, स्व. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जायकवाडी प्रकल्प साकारला. यंदा निसर्गाची कृपा झाली आणि ह्याच महिन्यात पाणी भरलं. गोदावरी खोरे हे सर्वात मोठे असले तरी तुटीचे खोरे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून या खोर्यात आणायचे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. जल संपदा मंत्री म्हणून गोदावरी खोर्यात पाणी आणण्याचे त्यांचे स्वप्न मी पूर्ण करणार. याद्वारे 65 टीएमसी पाणी इकडे वळवून आणता आले पाहिजे.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक आहेत, असे आवाहन श्री. विखे पाटील यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, संत ज्ञानेश्वर उद्यान ‘पीपीपी मॉडेल’वर विकसित करणार आहे. तेथे वॉटर स्पोर्ट, अत्याधुनिक संकल्पना विकसित करू. हा प्रकल्प इथल्या भागासाठी वरदान ठरेल. त्यामुळे पर्यटन विकास होईल. संत एकनाथांच्या भूमीत संत ज्ञानेश्वर उद्यान करणे हे मोलाचे काम होय. याशिवाय 12 मेगावॅट हायड्रो इलेक्ट्रीक प्रोजेक्ट, फ्लोटिंग सोलर प्रकल्प असे विविध प्रकल्पना चालना देण्यात आली आहे. तसेच ब्रह्म गव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी 150 कोटी दिले आहे. एक वर्षात ही योजना पूर्ण करणार असूनजलाशयांचे गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक आ. विलास भुमरे यांनी केले. त्यांनी जल प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाईप लाईनद्वारे द्यावे, शेतकर्यांच्या शेतापर्यंत रस्ते करावे, ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना, संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी मांडली. सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.
जलसाठा आणि विसर्ग
सध्या धरणात 90.13 टक्के पाणीसाठा आहे. धरणाची सध्याची पाणी पातळी 1520.18 फुट आहे. धरणाचा एकूण जलसाठा 2694.776 दलघमी असून 1956.67 दलघमी जिवंत साठा आहे. धरणाच्या विसर्ग नियमावलीनुसार सध्या 18 दरवाजे अर्धा फूट उघडून 9432 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. सद्यस्थितीत धरणात 16230 क्युसेस इतकी पाण्याची आवक आहे.सध्या धरण तुडूंब भरले असून दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या छोट्या मोठ्या धरणांतून पुढील प्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. दारणा 2 हजार 486, नांदुर मधमेश्वर 9 हजार 465, वालदेवी 407, भावली 290, भाम 1 हजार 651, वाकी 276, कडवा 2 हजार 52, वाघाड 1 हजार 192, गंगापूर 1 हजार 235, गौतमी गोदावरी 262, पालखेड 738 व कश्यपी 480 क्युसेस.
बालपणीच्या आठवणीत रमले विखे पाटील
आपल्या आठवणींना उजाळा देत विखे पाटील म्हणाले की, मी या प्रकल्पाचा लहानपणापासून साक्षीदार आहे. येथून जवळ असलेले खिर्डी हे माझ्या बहिणीचं गाव. तो पाण्यासाठीचा संघर्षाचा काळ होता. मी लहान होतो. बहिणीकडे इथं पैठणला मी येत असे. आमच्या आजोबांचा अमृत महोत्सवी सत्कार याच धरणावर स्व. इंदिराजी यांच्या हस्ते झाला होता. मी कृषी महाविद्यालयात शिकत असताना सायकलवर धुळ्याहून इथं संत ज्ञानेश्वर उद्यान येथे आलो होतो, अशीही आठवण श्री. विखे पाटील यांनी सांगितली.




