अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या सूचनांनुसार संपूर्ण देशभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांचे सर्व बँका आर्थिक समावेशन योजनांची संपृक्तता (पूर्तता) अभियान राबवणार आहे. नगर जिल्ह्यातील 1 हजार 316 ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून यात बँका सरकारी विमा पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय लाभार्थी वाढवण्यावर भर देणार आहेत.
नगर जिल्ह्यात सध्या पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय या विमा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अवघी 15 टक्के आहे. ग्रामीण भागात या विमा योजनेबाबत फारशी जागृतका नसल्याने हे प्रमाण कमी आहे. प्रत्येक खातेदाराला या सरकारी विमा योजनेत समाविष्ठ करून त्यांना विमा योजनेचा लाभ मिळावासाठी प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सुचनेनूसार लीड बँक (आग्रणीय बँक) यांच्यावतीने प्रयत्न सुरू सुरू करण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर आर्थिक संपृक्तता (पुर्तता) अभियान राबवण्यात येणार आहे.
या अभियानाच्या उद्देशात वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये समाविष्ट करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. अभियानाअंतर्गत बँकांना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत तीन महिने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात खातेधारकांच्या केवायसीची पुनर्पडताळणी, ज्यामध्ये विद्यमान निष्क्रिय पीएमजेडीवाय खात्यांचा समावेश आहे. तसेच पीएमजेडीवाय अंतर्गत बँक खाते नसलेल्या प्रौढांसाठी बँक खाती उघडणे. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) अंतर्गत नोंदणी. अटल पेन्शन योजना (एपीवाय) अंतर्गत नोंदणी, तसेच डिजिटल फसवणूक प्रतिबंध आणि दावा न केलेल्या ठेवींमध्ये प्रवेश मिळविण्याचे मार्ग आणि तक्रार निवारण यावर जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
याबात विशेष जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिय यांनी जिल्ह्यातील सर्व बँकर्सना प्रत्येक ग्रामपंचायतीत शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवायच्या अधिकार्यांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होवून सर्व बँकर्सना मदत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती लीड बँकेच्यावतीने देण्यात आली.
अशी आहे योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती ज्यांचे बँक खाते आहे, ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यांनी वार्षिक प्रीमियम 436 रुपये भरल्यास त्यांना या विमा योजनेत कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे संरक्षण आहे. हा विमा दरवर्षी नूतनीकरण करता येते, ऑटो-डेबिटद्वारे प्रीमियम भरला जातो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती ज्यांचे बँक खाते आहे, ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. वार्षिक 20 रुपये (बँक खात्यातून कापले जातात). या विमा योजनेत अपघातामुळे मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे संरक्षण आहे. या योजनेत वार्षिक नूतनीकरण, ऑटो-डेबिट सुविधा आहे.




