करजगाव (वार्ताहर)
नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी व कोपरगाव तालुक्यात कार्यरत ग्रामसेवकाने केलेल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला असून आत्महत्येस कोपरगाव येथील दोघा अधिकाऱ्यांना जबाबदार धरल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, बाजीराव रखमाजी बाचकर यांचे पोटात विषारी औषध गेल्याने 8 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे उपचारा दरम्यान निधन झाले होते.
वरिष्ठांच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून विषारी औषध घेऊन जीवन संपविल्याचा आरोप बाचकर कुटुंबीयाने केला आहे. बाचकर हे कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.
त्यांनी कोपरगाव येथिल पंचायत समितीच्या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केला. त्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या आशयाची चिठ्ठी मिळाली असल्याचे कुटुंबियाकडुन सांगण्यात आले आहे.
ती चिठ्ठी बाजीराव बाचकर यांचीच आहे का? याची खात्री व तपास सोनई पोलीस करत आहे. दरम्यान चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आली.





