अकोले |प्रतिनिधी| Akole
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचे आव्हान स्वीकारून सहकार बळकट करा. सरकार सचिवांना पाठबळ देईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
अकोले येथे स्वाभिमानी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी सचिवांच्या संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवशनाचे उद्घाटन ना. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.26) संपन्न झाले. आमदार डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, सत्यजीत तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे, सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांसह सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि राज्यातून आलेले सचिव उपस्थित होते.
ना. विखे पाटील पुढे म्हणाले, सेवा सहकारी सोसायटी समोर असलेल्या प्रश्नांचा यापूर्वी गांभीर्याने कधीच विचार झाला नाही. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला भक्कम पाठबळ मिळत आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात सहकार चळवळीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार असल्याने सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यपद्धतीला पाठबळ देवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार आणि सहकारातून रोजगार निर्मिती करण्याचे धोरण केंद्र सरकारचे असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा सहकारी सोसायटी वाटचालीचा इतिहास खूप मोठा आहे. परंतु ज्या उद्दिष्टांसाठी या संस्थांची सुरूवात केली ते पूर्ण होवू शकले नाही.
आव्हानात्मक परीस्थितीला सामोरे जावून सोसायट्यांचा कारभार सुरू आहे. त्यामुळे संस्थांना उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध करून देण्याचे धोरण मोदी सरकारचे असून सोसायट्या आता मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व्यवसाय करु शकतील. सोसायट्या अर्थिक विकासाचे केंद्र बनण्याऐवजी राजकारणाचे अड्डे बनल्या अशी खंत व्यक्त करून सोसायटी तोट्यात असली तरी संचालक होण्याची धडपड थांबत नाही. संचालकांच्या राजकारणात सचिवाचा बळी जातो ही परीस्थिती बदलण्याची गरज आहे. याकरीता सचिवांचे भविष्य घडविण्यासाठी पेन्शन योजना लागू करता येईल का याचाही विचार करण्याची सूचना त्यांनी केली. सोसायट्यांचे मानांकन करून त्याच्या दर्जाप्रमाणे बँकींग प्रणालीशी जोडून घेण्याचे प्रयत्न झाले तर सोसायट्यांना व्यवसायाची साखळी निर्माण होईल असे नमूद करुन सहकार चळवळ बळकट करा, सरकार तुम्हाला पाठबळ देईल, असे त्यांनी आश्वासीत केले.
सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, क्रांतिकारी निर्णय सहकार मंत्रालयाने घेतल्याने चळवळीला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या काही भागात सहकारात चांगले काम झाले. विदर्भात मात्र स्वाहाकार झाला. तुम्ही जबाबदारीने काम करता त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकार घेत आहे. मंत्रालयात यासाठी बैठक घेण्यात येणार असून सहकार चळवळीत असलेल्या त्रिस्तरीय रचनेत सोसायट्यांना नव्या सहकार धोरणात प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार तांबे यांनी संगमनेर-अकोले तालुक्यातील सहकार चळवळीची पार्श्वभूमी सांगून सहकार चळवळीमुळे शेतकरी जगला असल्याचे सांगून सचिवांच्या मागण्यासाठी केलेल्या पाठपुरव्याची माहिती दिली. आमदार लहामटे यांनी सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील असे सांगून राज्य सरकार चांगल्या पध्दतीने काम करीत असल्याने प्रश्नांची सोडवणूक निश्चित होईल, असे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी सचिवांचे प्रश्न प्रास्ताविकातून मांडले.




