अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्यादृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. अहिल्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी बैठक महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. मंत्री मंडळाच्या बैठकी बरोबरच शहरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनाचे त्रिशताब्दी वर्ष असून या वर्षाचे औचित्य साधून मंत्री मंडळाची बैठक श्रीक्षेत्र चौंडी येथे घेण्याचा निर्णय झाला. मंत्री मंडळाच्या बैठकीमुळे जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच काही विकासात्मक वाटचालीतील महत्वपूर्ण निर्णय या बैठकीतून होतील, अशी अपेक्षा ना. विखे पाटील यांनी बोलून दाखविली.
भाजपच्या येथील मध्यवर्ती कार्यालय इमारतीचा भूमीपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्यासह सभापती राम शिंदे, आ. शिवाजीराव कर्डीले, आ. मोनिका राजळे, आ. विक्रमसिंह पाचपुते, प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी, प्रदेश महामंत्री विजय चौधरी आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्ष कार्यालयाची भव्य अशी वास्तू शहरात उभारण्यात येत असून सर्व सुविधांनी परीपूर्ण असे कार्यालय लवकरच तयार होईल. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संपर्काच्यादृष्टीने तसेच संघटनात्मक कार्यासाठी जिल्हा स्तरावर हे कार्यालय महत्वपूर्ण ठरणार आहे.
महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील शासकीय विश्राम गृहाची इमारत पूर्ण झाली आहे. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्य उपस्थित राहातील. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 93 व्या जयंती दिनानिमित्ताने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या विस्तारीत 600 विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृहाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती शिंदे, महसूलमंत्री बावनकुळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.