मुंबई | Mumbai
आंदोलन हाताबाहेर गेलं… आंदोलनासाठी दिलेल्या अटी-शर्थींचं पालन व्हायलाच हवं, मुंबई उच्च न्यायलयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचे आहे, पण मराठा आंदोलकांसमोर पोलीस हेल्पलेस झाले आहेत असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात सांगितलं. तसेच बाहेरून येणारे आंदोलक हे गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत असा आरोप सदावर्ते यांनी केला. जेवणाचे साहित्य घेऊन येत असतील तर त्यांना मुंबईत येऊ द्यावे असा युक्तिवाद मराठा आंदोलकांच्या वकिलांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी आज घेण्यात आली. सोमवारी सुट्टी असताना देखील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. या प्रकरणी आता मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी काय युक्तिवाद केला?
मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळे घडवून आणले जात आहे. असा युक्तिवाद सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केलाय. तर सरकार आंदोलकांना बाहेर काढू शकत नाही. तुम्ही आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तसेच मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचा अवमान केला आहे, असा सदावर्तेंनी न्यायालयात दावा केला आहे. जरांगे यांचे समर्थक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा सदावर्ते यांचा न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे.
गुणरत्न सदावर्ते युक्तिवाद करताना म्हणाले की, “आंदोलनाला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती. आता संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जात आहे. आरक्षणाच्या राजकारणामुळे हे सगळे सुरू आहे. या आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना ट्रकने सगळे पुरवत आहेत.”
हायकोर्टाने आंदोलकांबाबत काय म्हंटले?
अजून आंदोलनकर्ते मुंबईत येत आहेत, त्यांना कसे अडवणार? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे जरांगे पाटील यांनी उल्लंघन केल्याची माहिती राज्य सरकारने दिली. त्यांनी अटी शर्तीनुसार आंदोलन करण्याचे मान्य केले होते. कोर्टाने जरांगे पाटील यांना निर्देश द्यावेत. पोलीस देखील कायद्यानुसार पावले उचलतील, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. जर कायद्याचे उल्लंघन झाले तर तुम्ही त्यांना का सांगत नाही? तुम्ही आंदोलन थांबवा हे तुम्ही त्यांना का सांगत नाही? असा सवाल देखील हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला. तसेच आता आंदोलन हाताबाहेर गेले आहे, असे देखील हायकोर्टाने म्हटले आहे.
मराठा आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलनासाठी जागा दिली असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी मराठा आंदोलक दिसत आहेत. त्यावर बाहेरून येणाऱ्या लोकांना आता थांबवा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याच प्रमाणे CSMT, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





