Sunday, September 8, 2024
Homeनगर15 हजार शेतकर्‍यांना गारपिटीचा फटका; सर्वाधिक नुकसान श्रीरामपूर तालुक्यात

15 हजार शेतकर्‍यांना गारपिटीचा फटका; सर्वाधिक नुकसान श्रीरामपूर तालुक्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील आठवड्यात 18 मार्चला जिल्ह्यात झालेल्या गारपिटीत 9 तालुक्यातील शेती पिकांना फटका बसला आहे. या गारपिटीत 128 गावांतील 14 हजार 785 शेतकर्‍यांचे 7 हजार 841 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यात सर्वात जादा नुकसान श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना बसला असून या ठिकाणी 6 हजार 981 शेतकर्‍यांचे 3 हजार 975 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

झालेल्या गारपिटीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कांदा, गहू, मका, भाजीपाला, चारापिके, ऊस, संत्रा, आंबा, डाळींब, चिकू, लिंबू, द्राक्ष, टोमॅटो, ज्वारी, हरभरा या शेती पिकांसह झेंडू या फूल पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाने रविवारी केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची ही आकडेवारीसमोर आली आहे. या गारपिटीतून अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर तालुके बचावले असून यामुळे नुकसानीची आकडेवारी मर्यादित राहिलेली आहे.

नगर तालुक्यातील 17 गावांत 3 हजार 459 शेतकर्‍यांचे 1 हजार 687 हेक्टरवर कांदा, गहू, भाजीपाला, चारापिके, ऊस, संत्रा, आंबा, डाळींब आणि चिकू पिकांचे. पाथर्डी तालुक्यातील 6 गावात 520 शेतकर्‍यांचे 330 हेक्टरवर कांदा, हरभरा, गहू, भाजीपाला, संत्रा आणि डाळींब. जामखेड तालुक्यातील 2 गावात 140 शेतकर्‍यांचे 65 हेक्टरवर कांदा, गहू, लिंबू, डाळींब पिकांचे. श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावांतील 6 हजार 981 शेतकर्‍यांचे 3 हजार 975 हेक्टवर गहू, मका, कांदा, द्राक्ष, डाळींब, आंबा, चिकू आणि भाजीपाला.

राहुरी तालुक्यातील 4 गावात 510 शेतकर्‍यांचे 210 हेक्टरवर कांदा, टोमॉटो, संत्रा, गहू आणि भाजीपाला पिकांचे. नेवासा तालुक्यातील 26 गावात 1 हजार 50 शेतकर्‍यांचे 310 हेक्टवर गहू, कांदा, आंबा पिकांचे. संगमनेर तालुक्यातील 9 गावात 950 शेतकर्‍यांचे 357 हेक्टवर द्राक्ष, डाळींब, कांदा, गहू, ज्वारी, मका, हरभरा, टोमॅटो, चारापिके, भाजीपाला आणि झेंडू पिकाचे. कोपरगाव तालुक्यात 1 गावात 80 शेतकर्‍यांचे 57 हेक्टरवर कांदा, गहू पिकाचे. राहाता तालुक्यात 8 गावात 1 हजार 95 शेतकर्‍यांचे 850 हेक्टरवर गहू, हरभरा, कांदा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झालेले आहे.

शनिवारच्या गारपिटीचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनला प्राप्त झाला असून तो तातडीने विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या