Saturday, July 27, 2024
Homeनगरपंचनाम्याचे आदेश; जिल्ह्यात ‘अवकाळी’चा कहर

पंचनाम्याचे आदेश; जिल्ह्यात ‘अवकाळी’चा कहर

10 जनावरे मृत्यूमुखी, 25 घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे 107 गावांमधील तब्बल 8 हजार 571 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कांदा, कापूस, मका, भात यासह द्राक्षे, पेरू, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक पारनेर व अकोले या दोन तालुक्यात मोठे नुकसान झाले असून या अवकाळी पावसामुळे 10 जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. तर 25 घरांची पडझड झाली आहे. महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने हा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी बरसण्याचे हे सलग चौथे वर्षे आहे. यामुळे आधीच दुष्काळाच्या उंबरठ्यावर असणार्‍या शेतकर्‍यांच्या जखमा आणखी रक्ताळ्यात आहेत. दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, काल सोमवारी रात्री नगर शहर व उपनगरात जोरदार पाऊस कोसळत होता. श्रीरामपूर शहर व परिसरातही अधूनमधून सरी कोसळत होत्या.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे 8 हजार 571 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात 15 हजार 307 शेतकरी बाधित झाले तर 10.90 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले. त्यात 12 शेतकरी बाधित झाले. या सर्व नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून कृषी विभागाने हा अहवाल आयुक्त कार्यालात पाठवला आहे. रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने पारनेर, संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव या तालुक्याला चांगलेच झोडपले. यात डाळिंब, कांदा, भात, मका, भाजीपाला, टोमॅटो पिकांचे नुकसान झाले.

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पशुधनाचीही हानी झाली. या अवकाळीत 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूरमधील खंडाळ्यात 1 बैलाचा मृत्यू झाला आहे. झाड विजेच्या तारांवर कोसळले व या तारा बैलाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. राहुरीत दोन मेंंढ्या, तीन कोकरू तर संगमनेरमध्ये चार मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. या वादळी वार्‍यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात 25 घरांची पडझड झाली आहे. त्यात अकोले 1, पारनेर 4, राहुरी 7, संगमनेर 10 तर श्रीरामपूर 2 घरांचा समावेश आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. जिल्ह्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या तालुक्यामध्ये पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. यात तालुक्यात 24 गावांमधील 7 हजार 459 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे 12 हजार 100 शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, केळी, मका, पेरू, डाळिंब, पपई, सिताफळ, टोमॅटो या पिकांचे नुकसान झाले आहे.

या तालुक्याखालोखाल अकोले तालुक्यात 60 गावांमध्ये अवकाळीने होत्याचे नव्हते केले आहे. 927 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे, कापूस, भात, कांदा या पिकांचे नुकसान झाले असून 2 हजार 910 शेतकरी बाधित आहेत. संगमनेर तालुक्यात 13 गावांमधील 133 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 215 शेतकरी तर राहाता तालुक्यातील 4 गावांमधील 52 हेक्टर क्षेत्रातील कापूस, मका, केळी या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका 82 शेतकर्‍यांना बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील 6 गावांमधील 10.90 हेक्टर क्षेत्रातील 12 शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र हे 33 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

अकोले, पारनेरमध्ये गारपीट

अकोले व पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाबरोबर गारपीटीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यात 60 तर पारनेर तालुक्यातील 17 गावांना गारपीटीचा तडाखा बसला आहे.

नोव्हेंबरमध्ये अवकाळीचे हे चौथे वर्ष

अवकाळी पाऊस नोव्हेंबर महिन्यांत पडण्याचे हे आता सलग चौथे वर्ष आहे. आतापर्यत यापूर्वी तीन वर्ष नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

अवकाळी पिकांना चांगला, पण गारपीट नको

सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका, ज्वारी या पिकांना अवकाळी पाऊस तसा उपयुक्त असला तरी गारपीट नको असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी व्यक्त केले. ज्वारी पिकांसाठी उपयुक्त असून चारा मोठ्या प्रमाणावर त्यामुळे उपलब्ध होणार आहे. सध्या जिल्ह्यात 1 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नगर 15, पारनेर 39, श्रीगोंदा 6, कर्जत 3, जामखेड 2, शेवगाव 41, पाथर्डी 27, नेवासा 35, राहुरी 45, संगमनेर 50, अकोले 46, कोपरगाव 44, श्रीरामपूर 46 आणि राहाता 42 असा जिल्ह्यात जिल्हा सरासरी 31 मिलिमीटर झाला आहे.

असे आहे नुकसान

जिल्ह्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. यामुळे ग्रामीण भागात काही नागरिकांच्या घरांचे किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार पारनेर तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. 100 जनावरे जखमी झाले असून चार घरांची पडझड झाली आहे. शिवाय 5 हजार कोंबड्याही दगावल्या. संगमनेर तालुक्यात 4 मेंढ्या मयत झाल्या असून 10 घरांची पडझड झाली आहे. राहुरी तालुक्यात 12 कोकरू, 6 मेंढ्या व 1 शेळी मयत झाली, तर घरांची पडझड झाली. अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतही घरांची पडझड झाली. श्रीरामपूरमध्ये 1 बैल दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकार्‍यांसमवेत पाहणी दौरा करणार असून सद्य:स्थितीत स्थानिक अधिकार्‍यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

श्रीरामपूरसह 9 मंडळांत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस

देवळालीत 110, अकोलेत 92 मिमी

पारनेर तालुक्यातील निघोज 82 मिमी, भातकुडगाव (ता. शेवगाव) 69 मिमी, नेवाशातील सलाबतपूर 69 मिमी, कुकाणा 69 मिमी, देवळाली 110, आश्वी 72 मिमी, तळेगाव 70 मिमी, पोहेगाव 66, श्रीरामपूर 65, वडाळा 78, सोनगाव 70, अकोले 92, संगमनेर तालुक्यातील सिबलापूर या 9 मंडळांत अतिवृष्टी झाली. याशिवाय पळशी 60, समनापूर 50, पिंपरणे 61, सात्रळ 61, ताहाराबाद 53, टाकळीमियाँ 57 आदी ठिकाणीही अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 59 महसूल मंडळात 20 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जून सप्टेंबर दरम्यान पावसाळ्यात महसूल विभाग अतिवृष्टी झालेल्या पावसाची नोंद घेत असते. उर्वरित काळात झालेल्या पावसाची नोंद ही अवकाळी पाऊस म्हणून घेण्यात येत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

ना. विखेंचे प्रशासनाला निर्देश

मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, आणखी काही दिवस पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकर्‍यांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नुकसानीची माहिती मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करण्याचे आदेश आपण प्रशासनास दिले आहेत. ग्रामीण भागात काही नागरीकांच्या घरांचे किंवा जनावारांच्या गोठ्याचे नुकसान झाले असल्यास तातडीच्या उपाय योजना तसेच मदत करण्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या आहेत. या नैसर्गिक संकटात राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या परीस्थीतीची पाहाणी करण्यासाठी अधिकार्‍यां समवेत पाहाणी दौरा करणार असून सद्य परीस्थीतीत स्थानिक अधिकार्‍यांनी नुकसान झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या