पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpari Nirmal
अतिवृष्टीने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होवून दोन महिने उलटून गेले असतानाही घोषणेप्रमाणे शासनाकडून शेतकर्यांना अजूनही एक दमडीची मदत मिळाली नाही. तसेच पीक विमा कंपनीनेही अल्प मोबदला देऊन शेतकर्यांची फसवणूक केली आहे. दिवाळीला मदत देऊ अशी शासनाची घोषणा होती. अद्यापही मदत मिळाली नाही. ही मदत तातडीने द्या अन्यथा येत्या दि. 11 नोव्हेंबरला राहाता तहसीलवर महिला व शेतकर्यांचा पशुधनासह बिर्हाड मोर्चा काढण्याचा इशारा लोणी खुर्दच्या ग्रा. पं. सदस्या कृषीभूषण प्रभाताई घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी दिला आहे.
याबाबत राहाता तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने दोन महिन्यांपासून सुरू केलेला कागदी घोडे नाचण्याचा प्रकार बंद करून तातडीने शेतकर्यांना मदत द्यावी तसेच पीक विमा कंपन्यांनी विम्याचे मोठे हप्ते घेऊन मोजक्याच शेतकर्यांना नाममात्र परतावे दिले तर मोठ्या प्रमाणात शेतकरी परताव्यांपासून वंचित आहेत. हे परतावे नुकसानीच्या प्रमाणात मिळावेत तसेच अतिवृष्टीने वाहून गेलेले शिवार वाहतुकीचे रस्ते प्रशासनाने तातडीने दुरूस्त करावे अन्यथा शुक्रवार दि. 11 नोव्हेंबरला राहाता तहसीलवर शेतकरी, महिला त्यांच्या लेकराबाळांसह व पशुधनासह बिर्हाड मोर्चा काढणार असल्याचे निवेदन राहात्याचे तहासीलदार कुंदन हिरे यांना देण्यात आले.
यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, डॉ. एकनाथ गोंदकर, विक्रांत दंडवते, श्रीकांत मापारी, राजेंद्र आहेर, रणजित आहेर, प्रसाद आहेर, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, भुमीपुत्र शेतकरी संघटनेचे राधुजी राऊत, राजेंद्र निर्मळ, वर्षा घोगरे, शांता आहेर, कृष्णाबाई तुपे, सविता घोगरे, सुजाता आहेर, लता मापारी, दिलीप आहेर, विलास घोगरे, शंकर राऊत, अण्णा तुपे, विनायक घोगरे, वसंत घोगरे, एकनाथ आहेर, बाबासाहेब मापारी, विशाल आहेर, अशोक आहेर, महेश आहेर, राहुल घोगरे, विठ्ठलराव शेळके, दिनेश शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते.