दहिवड | मनोज वैद्य
आज संध्याकाळच्या सुमारास देवळा तालुक्यातील दहिवड परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गावाशेजारी असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे सर्वच्या सर्व आठ ते दहा वर्गांचे पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला.त्याचप्रमाणे दहिवड व परिसरात अनेक झाडे पडली.
मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. आज संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यातच जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे सर्वच्या सर्व पत्रे उडून समोर असलेल्या झाडांना अटकले.
सध्या जून महिन्यात शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते म्हणून मोठा अनर्थ टळला. शाळा नियमित पणे चालू राहिल्यास असा प्रसंग उद्भवला असता तर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती. पत्रे उडाल्याचे वृत्त समजता विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी हजर होत प्रत्येक वर्गातील स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, पुस्तके, शैक्षणिक साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास मदत केली.
वादळी वाऱ्याने परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित असल्याने मदत कार्यास अडचण निर्माण होत होती. रात्री उशिरापर्यंत सदर ठिकाणी मदत कार्य सुरू होते.