वीरगाव (वार्ताहर) –
अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात शनिवारी सायंकाळी 6 वा.मुसळधार पावसाने हजेरी लावली. साधारण दीड तासापेक्षा अधिक
वेळ सुरु असणार्या मुसळधार पावसाने लोकांच्या मनात धडकीच भरली.
मुसळधार पावसात वीजपुरवठा काही काळ खंडीत झाल्याने अंधारात आभाळातून कोसळणा-या धारांनी ढगफुटी झाल्याचाच भास काही काळ झाला.उन्हाळी कांद्याचे प्रचंड नुकसान या पावसाने केले.
डिसेंबरात लागवड झालेल्या कांदा पिकात पाणी साचून त्यावर बुरशीचा मोठा प्रादुर्भाव होईल.नवीन लागवड झालेल्या कांद्याची तर पुरती विल्हेवाट लागली.त्यात पाणी साचून मूळे पुर्णपणे कुजून जातील.परिणामी उशिरा लागवड झालेला कांदा सगळाच हातातून गेला आहे
कांद्याचे बियाणे15 हजार रुपये पायलीने खरेदी करुन शेतकर्यांनी रोपे तयार केली होती.शेतीची मशागत,लागवड,खते-औषधे हा सारा खर्च पाण्यात वाहून गेल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पाहणी करुन शासनाने पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.सततच्या ढगाळ वातावरणाने शेतीची मोठी हानी झाली आहे.