येवला । प्रतिनिधी Yeola
शहर परिसरात आज, पावसाने जोरदार हजेरी लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांच मोठं नुकसान झाले. तर गावात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज, गुरुवार सकाळ पासून वातावरणात मोठा उष्मा जाणवत होता. दुपारच्या सुमारास अचानक शहर परिसरात पावसाच्या सरी आल्या. दहा – पंधरा मिनिटांच्या हलक्या सरी नंतर पुन्हा उन पडले. तर सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने पाणीच पाणी केले.
सायंकाळच्या पावसाने शहरातील विंचूर चौफुली लगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांच मोठं नुकसान झाले. या ठिकाणी नुकतेच नगरपालिकेने काँक्रिटीकरण सुरू केले आहे. परंतु पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था नसल्याने आज, झालेल्या पावसाने गुडघाभर पाणी साचून दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
या बरोबरच कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पाटोदा रोडवरही पण्याचे मोठे तळे साचले होते. तर गावात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दिसून आले. दरम्यान, ग्रामीण भागात मशागतीची, पेरणीची लगबग सुरु असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.