Saturday, July 6, 2024
Homeनाशिकभुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

लोणावळा येथील भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी असून भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी जा विधानसभेत भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पवार यांनी भुशी धरण धबधब्यात, पुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिल्याचेही पवार म्हणाले.

भुशी धरण परिसरातील दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे, कुंपण घालणे, सुरक्षिततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील. पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहितीफलक लावणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याचधर्तीवर दुर्गम धोकादायक स्थळीही सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या