Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘माझी माती, माझा देश’ अभियानातून ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम - मुख्यमंत्री

‘माझी माती, माझा देश’ अभियानातून ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले.

- Advertisement -

ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र सरकारच्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण आज शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा अगणित हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप आपण ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने करत आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या मंत्राचा जागर आजच्या काळात आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा वारसा आहे. त्यासोबत, संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची मोठी फळी या महाराष्ट्राने देशाला दिली. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांनी योगदान दिले. त्यामुळे केवळ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान देशभरात राबविले जात असल्याचे शिंदे म्हणाले. ऑगस्ट क्रांती मैदानाच्या ऐतिहासिक आठवणी, घटना आहेत. ते जपण्याचे काम मुंबई महापालिकेने केले आहे. आता राज्यातही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विविध यंत्रणा या सर्वांच्या समन्वयाने हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या