अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
समग्र शिक्षा अर्थात पूर्वीच्या सर्व शिक्षा अभियान यात आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणार्या उपाययोजना यानुसार राज्य आणि केंद्र सरकार तरतूद करणार आहे. समग्र शिक्षाच्या बजेटचे यंदापासून विकेंद्रीकरण करण्यात येणार असून यासाठी शिक्षकांची गरज आणि मागणी जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक, शिक्षण विभागात कार्यरत अधिकारी, तालुका पातळीवरील साधन व्यक्ती, तालुकास्तरीय विशेष तज्ज्ञ शिक्षक यांची एकदिवस कार्यशाळा घेतली. यात समोर येणार्या प्रमुख मागण्यांनुसार समग्र शिक्षाचे वार्षिक बजेट तयार करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळामधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी हा मूळ उद्देश ठेवून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आता शाळांना सोयी आणि सुविधा देणार आहेत. यात शाळाच्या वर्ग खोल्यांची नवीन बांधणी, दुरूस्ती यासह शाळेला विखंड विजेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे, तसेच विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना विविध प्रशिक्षण देणे आदी मागण्या यावेळी शिक्षकांकडून करण्यात आला. दरम्यान, शिक्षण विभागाने एक फॉर्म तयार करून तो शिक्षकांकडून भरून घेण्यात येणार असून त्यानूसार जिल्ह्याची सामुदायिक मागणी समोर येणार आहे. त्यानूसार आता समग्र शिक्षाचे बजेट तयार करण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरावर झालेल्या या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक कार्यशाळेला शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी राजश्री घोडके, लेखाधिकारी रमेश कासार, समग्रचे कार्यक्रम अधिकारी तथा विस्तार अधिकारी विलास साठे, सुनील शिंदे, जयश्री कार्ले, भाऊसाहेब साठे, राधाकिसन शिंदे, समग्र शिक्षाचे कार्यकारी अभियंता राहुल वाळके, महेश सुरडे, श्रध्दा मोरे, विश्वास भाटे, अरूण पवार, सुवर्णा जेजुरकर, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, गट समन्वयक, पीएम श्री शाळाचे मुख्याध्यापक, नोडल अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी समग्र शिक्षा अभिनात साधारपणे 15 ते 20 कोटींचा निधी मंजूर होता. यात प्रामुख्याने बांधकामाच्या निधीचा समावेश असतो. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्यादृष्टीने निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांकडून मागणी घेण्यात येणार असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे समग्रच्या अंदाजपत्रकात नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश होणार असल्याचा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.