मुंबई । प्रतिनिधी Mumbai
एखाद्या रेल्वेचे, रस्त्याचे किंवा हॉस्पिटलचे उद्घाटन करणे, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान करतात तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणे कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( NCP President Sharad Pawar) यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला.
मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांचे कार्यक्रम पाहिले आहेत, भाषणे ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकले आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकार असताना त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष या लोकशाहीच्या संस्था आहेत. त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळले जात नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेल्या पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, रविवारी नागपूर येथील विविध लोकार्पणच्या कार्यक्रमात विरोधी पक्षावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. काल, नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या शासकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणे कितपत योग्य आहे? असा सवाल पवार यांनी केला.
नागपूरच्या ( Nagpur) कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काही गोष्टी सांगितल्या. समृद्धी रस्त्याला विरोधकांनी विरोध केला, असा आरोप झाला. मला माहिती नाही कुणी विरोध केला. पण मी औरंगाबादला गेलो असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. हा जो रस्ता होतोय त्यामध्ये जमीन जात आहे. या जमिनीची रास्त किंमत देत नाही हे ऐकल्यानंतर मी स्वतः त्यावेळी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि हा विकासाचा प्रकल्प आहेत तो होत असेल तर त्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. परंतु ज्यांच्या जमिनी घेत आहात त्यांचे आयुष्य आणि उत्पन्नाचे साधन आहे त्यांना रास्त किंमत द्या म्हणजे त्यांना सन्मानाने जगता येईल, असे मी सूचवले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कधीही समृद्धी महामार्गाला विरोध केला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया
आपण एकसंघ राहूया आणि राज्य सर्वदृष्टीने पुढे नेण्यासाठी जे – जे काही करता येईल ते अखंडपणाने करत राहू. देशातील महत्वाचे राज्य म्हणून राज्याचा नावलौकिक वाढेल याची काळजी घेऊया आणि त्यासाठी सर्वांची साथ मिळेल, अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.