नवीन नाशिक । प्रतिनिधी
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षाने अचानक शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर त्यांनी सायंकाळी सावता नगर येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी संजय राऊत आणि पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
यावेळी बडगुजर म्हणाले कि, जिल्हाप्रमुख पदाबाबत मत व्यक्त करताना सांगितले की, “डी. जी. सूर्यवंशी यांना जिल्हाप्रमुख पद दिल्यापेक्षा विलास शिंदे यांना संधी दिली असती तर अधिक योग्य ठरले असते. संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेला मेसेज फोनवरून उपस्थित पत्रकारांना दाखवत त्यांनी आपली भूमिका बळकट केली. मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट कोणत्याही राजकीय हेतूने नव्हती, ती फक्त कामकाजाच्या अनुषंगाने होती, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी पक्षश्रेष्ठींवर अथवा स्थानिक नेतृत्वावर नाराज नाही. मी मंत्री गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा होतो, म्हणून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्याच वेळी अरविंद सावंत देखील उपस्थित होते, मग त्यांच्या बाबत काय असा सवालही बडगुजर यांनी यावेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच माझी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी संवाद झाला होता. संजय राऊत जेव्हा नाशिक दौर्यावर आले होते, तेव्हा माझ्या गाडीतूनच ते शिर्डीला गेले. परंतु मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्मचाऱ्यांच्या मागण्या व मनपा भरती संदर्भात भेटल्याची माहिती त्यांना कळताच, राऊत यांनी माझ्या गाडीतून उतरून जिल्हाप्रमुखांच्या गाडीत बसणे पसंत केले.
सध्या मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळी निर्णय घेईन आणि माध्यमांद्वारे तो जाहीर करेन,असे बडगुजर यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला बडगुजर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला पाठिंबा दर्शविला. या संपूर्ण घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात आगामी राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी पक्षात प्रामाणिकपणे महानगरप्रमुख व जिल्हाप्रमुख म्हणून पाच वर्ष जबाबदारी सांभाळली संघटना बांधली आणि लोकसभा निवडणूक जिंकली विरोधकांचे वार अंगावर घेतले कुटुंबाची सुद्धा पर्वा केली नाही मुला बाळांना सुद्धा अडचणीत आणण्याचे प्रयत्न झालेत त्यामध्ये कायदेशीर लढाई करून बाहेर पडलो यापुढेही कायदेशीर मार्गाने लढत राहू परंतु अचानकपणे पक्षाने केलेली कारवाई मला अद्याप समजलेली नाही पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका मी घेतली त्याचे स्पष्टीकरण मला मिळालेले नाही पक्षात खरे बोलणे व नाराजी व्यक्त करणे याची शिक्षा जर मिळत असेल तर यापुढे शिवसैनिकांनी काय अपेक्षा करावी
सुधाकर बडगुजर,नाशिक