मुंबई | Mumbai
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने प्रज्ञा सिंहसह सातही आरोपींना निर्दोष सोडले आहे. या निकालानंतर एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी देशभराचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तेव्हा त्यांच्याकडून जप्त केलेले ९०० रुपये परत मागितले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये समीर कुलकर्णी यांनी बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी, ‘मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून ९०० रुपये काढून घेतले आणि रेकॉर्डवर साडेसातशे रुपये दाखवले. ते ९०० रुपये मला परत मिळावेत . प्रश्न पैशांचा नाहीये‘ असे म्हटले.
समीर कुलकर्णी यांनी कोर्टात मागणी केली होती. त्यावर कोर्टाने असे म्हंटले की, कोणताही मुद्देमाल परत देण्याचा कोर्टाचा आदेश दिलेला नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. तरीही कुलकर्णी आपल्या पैशांच्या मागणीवर ठाम राहीले आहे.
निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी व्यक्त केला आनंद
याप्रकरणात निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे अभिनव भारत या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आता त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘मी आनंदी आहे कोर्टाच्या या निर्णयाने आमच्यावरचा डाग पुसला‘ असे रमेश उपाध्याय यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिक्खु चौकात बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. १७ वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिल रोजी सर्व सात आरोपींविरुद्ध निकाल राखून ठेवला होता. निकाल जाहीर करण्याची तारीख ८ मे निश्चित करण्यात आली होती. सर्व आरोपींना या दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





