Monday, May 20, 2024
Homeक्रीडाICC World Cup : शमी मोडणार झहीरचा विक्रम?

ICC World Cup : शमी मोडणार झहीरचा विक्रम?

वर्ल्डकपमध्ये भारताचे आतापर्यंत सहा सामने झाले असले तरी त्यातील अवघे दोनच सामने खेळून गोलंदाजीची धार दाखवणारा मोहंमद शमी मुंबईत उद्या गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या लढतीत विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर असून, तो भारतीय गोलंदाज झहीर खानचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषकात दोन सामन्यात नऊ विकेट घेऊन खळबळ उडवली आहे. शमीच्या भेदक मार्‍यापुढे न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. शमीने आतापर्यंत विश्वचषकातील 13 सामन्यात भाग घेताना 40 विकेट घेण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणार्‍या भारतीय गोलंदाजात तो तिसर्‍या क्रमांकावर आहे, पण तो लवकरच नंबर एक स्थानावर पोहोचण्याची शक्यता आहे. शमीचा फॉर्म पाहता, मुंबईत श्रीलंकेविरोधातच हा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजात झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे दिग्गज गोलंदाज प्रथम व दुसर्‍या स्थानी आहेत. शमीने 13 सामन्यात 40 विकेट घेतल्या आहेत. त्याला अव्वल स्थान गाठण्यासाठी फक्त पाच विकेटची गरज आहे. झहीर खान याने 23 सामन्यात 44 विकेट घेतल्या होत्या. शमी हा विक्रम 14 सामन्यात मोडण्याची शक्यता आहे.

2011 च्या विश्वचषक विजयात झहीर खान याचा सिंहाचा वाटा होता. आयसीसीच्या त्या स्पर्धेमध्ये झहीर खान याने 23 सामन्यात 4.47 इकॉनॉमिनीने 44 विकेट घेतल्या. झहीर खान याने विश्वचषकात 12 षटके निर्धाव फेकली व एक वेळा चार विकेट घेतल्या. भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. श्रीनाथने विश्वचषकाच्या 34 सामन्यात प्रतिनिधित्व केले. श्रीनाथने 34 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. श्रीनाथने विश्वचषकात दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. जवागल श्रीनाथने विश्वचषकात 21 षटके निर्धाव फेकली आहेत. शमीने 13 सामन्यात शामीने 40 विकेट घेण्याचा भीमपराक्रम करताना दोन वेळा पाच आणि चार वेळा चार विकेट घेतल्या आहे. याशिवाय अनिल कुंबळेने विश्वचषकात भारतासाठी 18 सामने खेळले आहेत. या सामन्यात 4.08 च्या इकॉनॉमीने त्याने 31 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणार्‍या भारतीय गोलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने 1983 चा विश्वचषक उंचावला होता. बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत भारताने चषकावर नाव कोरले होते. या विजयात कपिल देव यांचा मोठा वाटा होता. कपिल देव यांनी विश्वचषकाच्या 26 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले व 28 विकेट घेतल्या. एकाच सामन्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रमही कपिल देव यांच्या नावावर आहे. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजामध्ये कपिल देव पाचव्या क्रमांकावर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या