अहिल्यानगर (प्रतिनिधी)
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर जोरदार कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने एकाच दिवसात पाच गुन्हे दाखल करून एकूण 27 लाख 39 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 11 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. शुक्रवारी (6 जून) नेवासा, कर्जत, संगमनेर आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीवरून, गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी निर्दयपणे डांबून ठेवण्यात आली होती. त्यानंतर पंचासमक्ष छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले. नेवासा पोलीस ठाण्यात मोईज अबु चौधरी (रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून 9 लाख 40 हजार रूपये किमतीचे 16 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.
कर्जत पोलीस ठाण्यात सादीक जफ्फार कुरेशी (रा. हर्षनगर, कर्जत) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पसार झाला असून पोलिसांनी 30 हजार रूपये किमतीचे तीन जनावरांची सुटका केली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अब्दुलसमद जावेद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व आयाज हबीब कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून 5 लाख 70 हजार रूपये किमतीचे 9 जनावरांची सुटका केली आहे. दुसर्या एका कारवाईत चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये सोनु उर्फ अतीक रफिक कुरेशी, कलीम जमील कुरेशी (दोघे रा. मोगलपुरा, संगमनेर), जिशान हाजी कुरेशी (रा. खाटीकवाडा, मोगलपुरा, संगमनेर) व आकीब हारूण कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) यांचा समावेश आहे. तेथून 6 लाख 30 हजार रूपये किमतीच्या 9 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात अन्वर अमीन मंडल (रा. कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर), भा. कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही) व समीर कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भा. कुरेशीच्या कत्तलखान्यातून 1 हजार 630 किलो गोमांस, वजन काटा, इलेक्ट्रिक मशीन असा 5 लाख 69 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपनिरीक्षक अनंत सालगुडे व राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, चंद्रकांत कुसळकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव, मनोज लातुरकर, रवींद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, रमीझराजा आत्तार, अमृत आढाव, महादेव भांड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.