नाशिक | शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक
राजकारणाचा स्तर आजकाल किती खालावलाय याचे रोज दूरचित्रवाणीवर दर्शन होतच असते. कोण कोणाला काय बोलेल, किती खालच्या थराला जाईल याला काही धरबंधच राहिलेला नाही. सध्या तर कोणतेही चॅनल लावले की त्यात पुढार्यांचा अक्षरश: शाब्दिक हैदोस चालू असतो. जे दिल्लीत तेच गल्लीत या न्यायाने हल्ली गावागावातही साध्या गोष्टीवरुनही एकमेकांच्या सात कुळांचा उध्दार तरी केला जातो किंवा थेट गळ्यालाही हात घातला जातो.
राजकारणात तर कोणत्याही गोष्टीचे द्रुतगतीने अनुकरण करण्याचीही हल्ली फॅशन झाली आहे. इतके दिवस बॉलिवूडच्या कलाकारांचीच फॅशन उचलली जायची परंतु आजकाल हे कलाकार मागे पडून राजकारणातील ‘कल्ला’कारच ‘मोस्ट वाँटेड’ झाले आहेत. खरे तर हे सगळे आठवायचे कारणही तसेच आहे. सध्या मुंबईसह राज्याच्या काही भागात राजकारण्यांची परस्परांशी जी शाब्दिक झोंबाझोंबी चालू आहे, त्याचा पुढचा अंक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, माधव गडकरी, शांतीलाल सोनी अशा दिग्गजांमुळे नावलौकिक मिळविलेल्या निफाड शहरात घडला आहे.
निफाड नगर परिषदेच्या दोघा जबाबदार नगरसेवकांमध्ये झालेल्या फ्री-स्टाईलमुळे सर्वत्र त्याची चर्चा तर होत आहेच, पण असे काय घडले की दोघांमध्ये थेट हाणामारी व्हावी, याचे औत्सुक्य अधिक आहे. संयमाला राजकारण्यांनी केव्हाच सोडचिठ्ठी दिली आहे, निफाडचा प्रकार हा त्याचाच एक भाग. राज्याचे मंत्रीच जर अद्वातद्वा बोलण्यात धन्यता मानत असतील तर त्यांच्या गल्लीबोळातील शागीर्दांनी पुढची पायरी गाठली तर बिघडले कुठे, असेही बोलायला त्यांची भक्तमंडळी कमी करणार नाहीत.
खरेतर नाशिक जिल्ह्यात निफाडमधील राजकारणाचे सदैव वेगळेपण राहिले आहे. पूर्वीही नेते होते. गट होते. एकमेकांविरुध्द आरोपांची सरबत्ती व्हायची. जाहीर सभेत तर प्रतिस्पर्ध्याची पळता भूई थोडी व्हायची. पण या संघर्षमय राजकारणातही एक मर्यादा पाळली जायची. लढाई ही शाब्दिक अन् ती देखील संयमाला धरुन असायची. माधवराव बोरस्ते, प्रल्हाद पाटील कराड किंवा माधवराव खंडेराव मोरे यांच्या मुलुख मैदानी तोफा धडाडायच्या. त्यांच्या भाषेतच जरब असे. त्याने प्रशासन किंवा विरोधक घायाळ व्हायचे, पण शारीर जखमा व्हायच्या नाहीत.
मालोजीराव मोगल, माणिकराव बोरस्ते, कल्याणराव पाटील, मंदाकिनी कदम आदींनी सभा फारशा गाजवल्या नसल्या तरी त्यांच्या भाषेत एकप्रकारची संयमाची परीक्षा असे. पुढे अनिल कदम व दिलिप बनकर यांच्या काळात आरोप-प्रत्यारोपांची पातळी बिघडत जरुर गेली, पण त्यांनीही मर्यादाभंग कधी केला नाही. दोघांच्याही स्वभाववैशिष्ठ्याचा प्रसाद तालुक्यातील अनेकांनी खाल्ला असला तरी त्यांच्या नेतेपदाला मान्यता मात्र राहिली. अलिकडे मात्र सगळेच बिघडायला लागले. या पार्श्वभूमीवर निफाड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे व नगरसेवक जावेद शेख यांच्यात झालेली हाणामारी तसेच एका कार्यकर्त्याने आपल्याच नेत्याला दूरध्वनीवरुन, माझ्या पदाआड येवू नका असा दम देतांना केलेली शिवीगाळही चर्चेत आहे. या घटनांची रेकॉर्डिंगही व्हायरल केली गेल्याने एकुणच राजकारण आता कोणत्या थराला चालले आहे, याची भीषण प्रचिती येते.
निफाड नगर परिषदेत सध्या माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार व अनिल पाटील कुंदे यांच्या शहर विकास आघाडीची सत्ता आहे. दर सहा महिन्यांनी नगराध्यक्ष बदलण्याचे आघाडीत ठरले आहे. (या संगीतखुर्चीने आधीच विकास कामांचे तीनतेरा वाजून जनता वैतागली आहे.) अनिल पाटील कुंदे हे मात्र उपनगराध्यक्षपदी कायम आहेत व त्यांच्याच आदेशाने कारभार चालतो. शिंदेंच्या शिवसेनेचे ते तालुकाप्रमुखही आहेत. नगर परिषदेच्या सत्तेत गेला काही काळ त्यांचा प्रभाव आहे. बरेच पक्षही त्यांनी पालथे घातले आहेत.
त्यांचे सहकारी जावेद शेख हे नगरसेवक असले तरी त्यांनीही अनेक पक्ष बदलत विक्रम केला आहे. त्यांना माहितीचा अधिकार व त्यासाठी करावयाच्या अर्जफाट्यांचा भारी शौक. स्वत: नगरसेवक असले तरी विविध कामांच्या दर्जाबाबत माहिती मागविणे, काम खराब चालले असेल तर तक्रारी करणे यात त्यांना अधिक आनंद शेख यांच्या या स्वभावामुळे प्रशासनाला वेठीस धरले जाते व त्याचा फटका विकास कामांना बसतो, असा कुंदेंचा आरोप आहे. काही असंतुष्टांना हाताशी धरुन आपली बदनामी केली जात असल्याने त्याबाबत जाब विचारला, असे कुंदेंचे म्हणणे आहे. तर, शेणाचा ट्रॅक्टर उपनगराध्यक्षांच्या शेतात चालला असतांना आपण त्याला हटकल्याच्या रागातून कुंदेंनी मारहाण केल्याचा दावा शेख यांनी केला. या दोघांच्या या वादाचे पर्यवसान मात्र भलतेच झाले असून आता नगर परिषदेत चालणार्या भल्याबुर्या कामांची लोक जाहीर चर्चा करु लागले आहेत.
कचरा ठेकेदाराकडून नगरसेवकांच्या वाहनांना होणार्या कथित इंधन पुरवठ्याबाबतही लोक उघडपणे बोलू लागले आहेत. एवढेच नव्हे तर पन्नास कोटींच्या पालखेड जलवाहिनीच्या निधीवरुन ही सारी साठमारी असल्याचीही वदंता आहे. बरेच अर्थकारण दोन बोक्यांमध्येच फिरत असल्यानेही अनेक नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जाते. कुंदे व शेख हे दोघे यातील नेमक्या कोणत्या मुद्यावरुन गुद्यांवर आले, याची मात्र तड लागत नाही. परंतु जे झाले ते चांगले झाले असेही आता लोक बोलत आहेत, कारण या दोघांमध्ये भानगड झाली नसती तर नगरपरिषदेत चालणार्या या इतर व्यवहारांना असे जाहीर पाय फुटले नसते.!