नाशिक | प्रतिनिधी
’प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचातींमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हात १५ तालुकांमध्ये प्रत्येक तालुक्यात २ गावे निश्चित केल्यानुसार एकूण २९ गावांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. कौशल्य विकास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ५०० ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून येत्या १९ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये त्या दृष्टीने हा कौशल्य केंद्राची ही संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईल. हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह आपल्या महिला व बालविकास विभागांचा या मध्ये सहभाग असणार आहे.
पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या – ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजुबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटक यांचा कार्यक्रमात सहभाग वाढावा यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत सदस्यांपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात आपला सहभाग नोंदवतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.