दिल्ली । Delhi
भारताने जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जागतिक नाणेनिधी (IMF) च्या ताज्या आकडेवारीनुसार भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जपानला मागे टाकत भारताने ही महत्त्वाची कामगिरी केली आहे, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी दिली आहे.
नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर सुब्रमण्यम यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था आता 4 ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचली आहे. IMF च्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी सांगितले की, भारताने आता जपानलाही मागे टाकले आहे. आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत. सुब्रमण्यम यांच्या मते, भारताची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत वेगाने वाढते आहे. नियोजित मार्गदर्शनानुसार पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जर्मनीलाही मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. यासाठी देशात स्थिर आर्थिक धोरणं आणि भक्कम नेतृत्वाची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे या यशामागील एक प्रमुख कारण मानले जात आहे. मोदी सातत्याने आपल्या भाषणांमधून भारताच्या आर्थिक प्रगतीचा आत्मविश्वासपूर्ण आवाज जनतेपर्यंत पोहोचवत असतात. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नातूनच हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे. सुब्रमण्यम यांनी यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालाचा उल्लेख केला. त्यानुसार, या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था केवळ चीनच नव्हे तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. भारताच्या जलद आर्थिक वाढीमुळे जागतिक पातळीवर भारत एक आघाडीचा खेळाडू म्हणून उदयास येत आहे.
भारताच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती भक्कम असून विविध क्षेत्रांतील विकास वेगाने होत आहे. उत्पादन, सेवा, माहिती-तंत्रज्ञान, कृषी, वाणिज्य यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत सातत्याने प्रगती करत आहे. ही कामगिरी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेतही लक्षणीय वाढ झाली आहे. परदेशी गुंतवणूकदार भारताकडे अधिक विश्वासाने पाहू लागले आहेत. त्याचप्रमाणे भारतातील स्टार्टअप्स, नवउद्योजकता आणि नवसंधी यांचा फायदा देशाच्या एकूण जीडीपीला होत आहे.