नवी दिल्ली –
देशातील नागरिकांना लवकरच करोना प्रतिबंध लस देण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून त्यानुसार देशातील 30 कोटी जनतेला लस देण्यात येईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, करोना काळात लढणारे आघाडीचे कर्मचारी जसे पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी, 50 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसेच 50 वयापेक्षा कमी असलेल्या पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती या लोकांचा या प्राधान्यक्रमामध्ये समावेश असेल.
आमचा प्रयत्न आहे की, आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला करोना प्रतिबंध लस मिळावी. लसीच्या अनिश्चिततेबाबत निर्माण झालेल्या अडचणीबाबत आम्ही माहिती देत राहू. पण जर एखाद्याने ठरवलं की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला जबरदस्ती करु शकत नाही, असंही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं. पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य होते. त्याप्रमाणेच शेवटी करोनाचा संसर्ग देखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल, असा विश्वासही यावेळी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला.
कशी सुरु आहे लसीकरण मोहिमेची तयारी
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने लसीकरण मोहिमेची तयारी असून यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर तयारी सुरु आहे. यासाठी टास्कफोर्स नेमण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी हजारो लोकांना देशभरात प्रशिक्षण दिलं गेलं आहे. सध्या राज्य स्तरावर प्रशिक्षण मोहिम सुरु असून याअंतर्गत 260 जिल्ह्यांमधून 20,000 कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.