नवी दिल्ली | New Delhi –
देशात लॉकडाउन टप्प्याटप्प्यानं शिथिल होत असताना दुसरीकडे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. मागील काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला 50 हजारांच्या सरासरीनं वाढत असल्याचं दिसून येत आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 20 लाख 27 हजार 75 इतकी झाली आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत करोनाचे 62,088 नवे बाधित आढळले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे 15 लाखांवरून 20 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी फक्त नऊ दिवसांचा कालावधी लागला आहे. coronavirus
देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर एक लाख रुग्णसंख्या होण्यासाठी तब्बल 78 दिवसांचा कालावधी लागला होता. 18 मे रोजी देशातील रुग्णसंख्या 1 लाखांवर पोहोचली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. एक लाखावरून पाच लाख रुग्णसंख्या होण्यासाठी 39 दिवसांचा कालावधी लागला. 18 मे ते 26 जून या काळात देशात तब्बल चार लाख रुग्णांची भर पडली. 16 जुलै रोजी देशातील रुग्णसंख्या 10 लाखांवर पोहोचली. 5 लाखांवरून 10 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी फक्त 20 दिवस लागले. विशेष म्हणजे लॉकडाउन शिथिल करण्याच्या निर्णयानंतर ही वाढ झाली आहे. 16 जुलैपासून देशातील रुग्णवाढीची कालमर्यादा कमी होत गेल्याचं दिसून आलं. 10 लाखांवरून 15 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी 12 दिवस लागले. या काळात देशात दिवसाला 45 हजार ते 55 हजार या सरासरीनं रुग्ण आढळून आले. तर 6 ऑगस्ट रोजी देशातील रुग्णसंख्येनं 20 लाखांचा टप्पा पार केला. 15 लाखांवरून 20 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी केवळ नऊ दिवसांचाच कालावधी लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे या काळात भारत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येत जगात पाचव्या स्थानी गेला. भारतानं इटलीलाही मागे टाकलं.
राहुल गांधींचा दावा ठरला खरा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 17 जुलै रोजी एक ट्विट करत 10 ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. महत्त्वाचं म्हणजे भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्येने 10 ऑगस्टच्या आधीच 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान त्यांनी करोना रुग्णांसंबंधी केलेला हा दावा खरा ठरला असल्याने राहुल गांधीचं ट्विट सध्या चर्चेत आहे.