नवी दिल्ली | New Delhi
भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) अनपेक्षित युद्धबंदीने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, युद्धबंदीनंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने युद्धविराम मोडत भारतीय शहारांवर ड्रोन हल्ले केले. यावरून आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान केले करत पाकिस्तानला इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचे उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले की, “भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. आम्ही फक्त बॉर्डर लगतच्या सैन्य ठिकाणांवरच नाही तर सैन्याने थेट रावळपिंडीपर्यंत हादरा दिला. भारतात दहशतवादी कारवाया करण्याचे काय परिणाम होतात हे उरी घटनेनंतर सगळ्या जगाने पाहिले. पुलवामातही याचा प्रत्यत आला. आता पहलगाम मधील घटनेनंतरही जगाला दिसत आहे की भारताने कशा पद्धतीने एअर स्ट्राइक केला”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. हे ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि त्याच्या लष्करी सामर्थ्याच्या क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन आहे. आम्ही दाखवून दिले आहे की, जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई करतो तेव्हा सीमेपलीकडील जमीनही दहशतवाद्यांसाठी आणि त्यांना पोसणाऱ्यांसाठी सुरक्षित राहत नाही,” असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले.
तसेच “पाकिस्तानमधील दहशतवादी (Teerorist) पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला”, असेही राजनाथ सिंह म्हणाले.