नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) २२ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारताच्या (India) २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने (India Government) भविष्यात आमच्या जमिनीवर झालेला कोणताही दहशतवादी हल्ला आम्ही देशाविरूद्धचे युद्ध मानू आणि त्याला त्याचप्रकारे उत्तर देऊ, अशी भूमिका घेतली आहे. यावरून भारताने दहशतवादाविरोधात अतिशय कठोर पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. भारताला अशांत करण्याच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सातत्याने हल्ले घडवून आणतात. त्या हल्ल्यांना भारताला वेळोवेळी प्रत्युत्तरही दिले जाते. मात्र तरीही दहशतवादी हल्ले थांबत नाहीत. त्यामुळे भारताने यासंदर्भात आपली भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
India has decided any future act of terror will be considered an act of war against country and will be responded accordingly: Govt sources
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
दरम्यान, भारतीय घटना आणि आंतरराष्ट्रीय कायदे, कोणत्याही देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार देतात. हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील कलम ५१ नुसार स्वसंरक्षणाच्या अधिकाराशी सुसंगत आहे. भारतीय घटनेच्या कलम १४ (कायद्यापुढे समानता) आणि कलम २१ (जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार) हे अधिकार देण्यात आलेले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कलमे (Law) महत्त्वाची आहेत.
ॲक्ट ऑफ टेररमध्ये या कृत्यांचा होतो समावेश
दहशतवाद हा मुद्दाम केलेला हिंसाचार असतो ज्याचा मूळ उद्देश हा लोकांमध्ये भय निर्माण करणे आणि त्यांच्या जिवीताला हानी पोहोचवण्याचा असतो. बॉम्बस्फोट घडवून आणणे, गोळीबार, विमान अपहरण, सायबर हल्ला ही सगळी कृत्ये अॅक्ट ऑफ टेररमध्ये समाविष्ट आहेत. सरकारी ठिकाणे लक्ष्य करणे आणि सैन्याच्या तळांवर अथवा छावण्यांवर हल्ले करणे हे देखील यामध्ये समाविष्ट आहेत.