नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तानकडून सतत भारतातील (India) विविध ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने (Pakistan) सीमावर्ती भागात केलेल्या गोळीबारात अनेक गावातील घरांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने ७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केले. त्यानंतरही भारतीय सैन्याकडून सीमेपलीकडे असलेले टेरर लॉन्च पॅड्स उद्ध्वस्त करण्याच काम सुरु आहे.
अशातच भारतीय सैन्याने (Indian Army) अभिमानास्पद कामगिरी आणि अंगावर शहारे आणणारा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या (Video) बॅक ग्राउंडला ‘कदम-कदम बढ़ाये जा, खुशी के गीत गाये जा… ये जिन्दगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा’ या गाण्याची म्युझिक सुरु आहे. तर भारतीय जवान हेवी आर्टिलरी गनद्वारे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील एक-एक दहशतवादी तळ नष्ट करत आहेत.
पाकिस्तानने ०८ आणि ०९ मे २०२५ च्या रात्री जम्मू-कश्मीर आणि पंजाबच्या अनेक शहरात ड्रोन हल्ल्याचा (Drone Attack) प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानच्या या दुस्साहसाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड नष्ट केले. नियंत्रण रेषेच्याजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील हे दहशतवादी लॉन्चपॅड भारतीय नागरिक आणि सुरक्षा पथकांवर हल्ल्यासाठी वापरले जात होते. भारतीय लष्कराच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानला भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर
भारताच्या लष्करी तळांवर शुक्रवारी (दि.०९ मे) रोजी रात्री सुपरसॉनिक क्षेपणास्त्रं डागणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने चांगलाच धडा शिकवला. भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक (Air Strike) करुन पाकिस्तानी लष्कराचे चार हवाई तळ उद्ध्वस्त केले. यापैकी रहिम यार या हवाई तळावर भारताच्या फायटर विमानांकडून क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा करण्यात आला. यामध्ये रहीम यार हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच येथील विमानांसाठीची धावपट्टी क्षेपणास्त्रांमुळे पूर्णपणे नष्ट झाली आहे. त्यामुळे आता या हवाई तळावरुन पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही.