नवी दिल्ली | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविले. या हल्ल्यात भारताने (India) पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या हल्ल्यनंतर पाकिस्ताना पुरता गोंधळून गेला असून, सातत्याने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारतीय सैन्य दल हे हल्ले हाणून पाडत आहेत.
अशातच आता भारतीय सीमा सुरक्षा दलाने (Border Security Force) जम्मूमधील सांबा सेक्टरमधून काल रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. याबाबत बीएसएफने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. या कारवाईदरम्यान, बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमा चौकीचे मोठे नुकसान केले आहे.
#WATCH | On 8-9 May 2025, BSF foiled a major infiltration bid at the International Boundary in Samba district, J&K by killing at least seven terrorists and causing extensive damage to the Pakistan Post Dhandhar, says BSF.
(Source: BSF) pic.twitter.com/c2MWOUuvQs
— ANI (@ANI) May 9, 2025
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, “जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये, ८ आणि ९ मे २०२५ च्या मध्यरात्री, दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या दहशतवाद्यांना (Terrorists) घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी रेंजर्सच्या चौकीतून गोळीबार करण्यात आला. परंतु बीएसएफच्या (BSF) सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न निष्फळ ठरवत किमान ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानी रेंजर्स पोस्टचे मोठे नुकसान केले,” असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
दरम्यान, काल रात्री पाकिस्तानने (Pakistan) नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.