नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असलेला सिंधू जल करार भारत सरकारने स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानची आदळआपट सुरू झाली आहे. पाकिस्तानातील मंत्री आणि नेते भारताला धडा शिकवण्याची भाषा करत आहे. त्यात आता माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी सिंधू नदीतून पाणी वाहिले नाही, तर भारताचे रक्त वाहणार, अशी धमकी दिली आहे.
एका रॅलीत पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी हा इशारा दिला. सिंधू नदीजवळ उभे राहून भारताला स्पष्ट शब्दांत सांगतो… सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील… एकतर या नदीचे पाणी वाहत राहील किंवा आमची नदी आमच्याकडून हिसकावून घेऊ पाहणाऱ्यांचे रक्त वाहील, असा इशारा त्यांनी दिला.
सखरमध्ये झालेल्या सभेत बिलावल भुत्तोंनी भारताविरोधात थयथयाट केला. ते म्हणाले, “जी घटना काश्मीरमध्ये झाली आणि भारताने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताने आपल्या उणीवा लपवण्यासाठी, त्यांच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोदींनी पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत.”
“या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी घोषणा केली आहे. हा त्यांचा एकांगी निर्णय आहे की, जो सिंधू जल करार आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला; ज्या माध्यमातून भारताने हे मान्य केलेले आहे की, सिंधू पाकिस्तानची आहे”, असे भुत्तो म्हणाले.
सिंधू नदी पाकिस्तानची आहे, असे या करारात भारताने म्हटले आहे. पण आज, आम्हाला हा करार मान्य नाही, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. हे असे होणार नाही. हे गोष्ट कोणीही स्वीकारणार नाही. पाकिस्तानची जनता तर हे मान्य करणार नाहीच, पण लोक सहमत होणार नाहीत आणि भारतातील लोकही आपल्यावरील हा अत्याचार सहन करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
“मोदींनी आणि त्यांच्या सरकारने घोषणा केली की, आता कोणताही करार मानणार नाही. आणि मी सखरमध्ये, याच सिंधू नदीच्या काठावरून भारताला सांगू इच्छितो की, सिंधू आमची आहे आणि आमचीच राहणार. एकतर या नदीतून आमचे पाणी वाहणार, नाही तर त्यांचे रक्त वाहणार”, अशी गरळ बिलावल भुत्तोंनी ओकली आहे.
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आपण सर्वांनीच निषेध केला आहे. पाकिस्तान स्वतः दहशतवादाने ग्रस्त आहे, असे आम्ही सांगितलेही, पण तरीही भारताने या हल्ल्यासाठी आम्हालाच जबाबदार धरले. जर तुमची लोकसंख्या मोठी असेल आणि तुम्ही एक मोठा देश असाल तर, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणताही निर्णय घ्याल! पाकिस्तानचे लोक अभिमानी आणि धाडसी आहेत…त्यांना आपल्या हक्कांचे रक्षण कसे करायचे हे माहीत आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी जिथे जातात तिथे ते स्वतःला हजारो वर्षे जुन्या संस्कृतीशी संबंधित असल्याचे सांगतात. पण मी हे तुम्हाला सांगतो की, आज आपण जिथे उभे आहोत तिथे सिंधू संस्कृतीचा जन्म झाला. आपण या संस्कृतीचे खरे वारस आहोत. आपण या नदीचे खरे वारस आहोत, असे त्यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा