नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) २६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करत सिंधू नदीचे पाणी थांबवण्याची घोषणा केली होती. यानंतर शनिवारी भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा आयात-निर्यात व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.या दोन्ही निर्णयांमुळे पाकिस्तानची चांगलीच नाकेबंदी झालेली असताना आता भारताने आणखी एक दणका दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने चिनाब नदीवर बांधण्यात (Chenab River) आलेल्या बगलिहार धरणाचे (Baglihar Dam) पाणी रोखले आहे. भारत सरकारचा हा निर्णय पाकिस्तानला जबर दणका मानला जात असून, यामुळे पाकिस्तानात लवकरच पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भारत सरकार झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे पाणी रोखण्याची सुद्धा योजना तयार करत असल्याची माहिती समोर येत आहे. बगलिहार आणि किशनगंगा धरणे बंद करून भारत झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रवाह कमी करू शकतो.
दरम्यान, बगलिहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील (India and Pakistan) अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे नीलम (झेलमची उपनदी) नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत. .
सिंधू पाणीवाटप करार नेमका काय आहे?
सिंधू पाणी वाटप करार १९६० मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. या करारानुसार, रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्याचे अधिकार भारताच्या नियंत्रणात देण्यात आले. तर सिंधू, चिनाब व झेलम नद्या पाकिस्तानच्या नियंत्रणात राहिल्या. मात्र भारताला काही मर्यादित प्रमाणात सिंचन, वीज निर्मिती आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती.मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर कारवाई करत हा करारच स्थगित करून टाकला.