नवी दिल्ली | New Delhi – भारतात करोना रुग्ण संख्या दहा लाखांच्या वर पोहचली आहे. करोना विषाणूच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली असून देशातील परिस्थिती बिकट असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमए) Indian Medical Association (IMA) रविवारी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारताचे वर्गीकरण क्लस्टर ऑफ केसेस या संवर्गात करण्यात आले आहे. या अहवालातील समूह संसर्ग सुरु झालेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव आहे.
भारतात दररोज 30 हजारांतून अधिक रुग्ण वाढत आहेत. ही एकूणच वाईट आणि चिंताजनक परिस्थिती आहे. यात अनेक घटक जोडलेले आहेत. शहरापर्यंत मर्यादित असणारा करोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. हे एक वाईट लक्षण असून देशात समूह संसर्गाला सुरूवात झाली असल्याचे आयएमएफ हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.के मोंगा यांनी म्हटले आहे.
देशातील करोना रुग्णांच्या संख्येत तेजीने वाढ होत आहे. यामुळे देशातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे मोंगा यांचे म्हणणेआहे. गाव-खेड्यांमध्ये करोनाचासंसर्ग झाला असून तेथील रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशीच संख्या वाढत राहिल्यास तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते, असेही मोंगा म्हणाले.
दिल्लीमध्ये संसर्ग रोखण्यास आपण सक्षम होतो. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेशातील अंतर्गत भागाचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हे करोनाचे नवे हॉटस्पॉट ठरू शकतील. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी, अशा सूचना यावेळी मोंगा यांनी दिल्या.