नवी दिल्ली –
करोना महामारीचा फटका बसलेला भारत हा जगातील दुसरा देश आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत
90,000 रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
मंत्रालयानं म्हटलं, भारतानं एक महत्वाचा टप्पा ओलांडला असून देशाचा राष्ट्रीय करोना रिकव्हरी रेट हा 80 टक्क्यांच्यापुढे गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. गेल्या तीन दिवसांत भारतात 90,000 पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षा अधिक आहे. तर उर्वरित 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट 79 टक्के आहे. आज एकूण बरे झालेले रुग्ण 44 लाखांच्या (43,96,399) जवळपास आहेत. त्यामुळे जगातील एकूण बरे होण्यार्या रुग्णांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी आहे. जगातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी 19 टक्क्यांहून अधिक आहे.
देशात सोमवारी 86,961 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 54,87,580वर पोहोचली आहे.
महाराष्ट्राला सर्वाधिक फटका –
देशात महाराष्ट्राला सर्वाधिक करोनाचा फटका बसला आहे. राज्यात सध्या 2,97,866 अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर 32,216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कर्नाटक हे दुसरं सर्वाधिक फटका बसलेलं राज्य आहे. या राज्यात सध्या 98,583 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर आंध्र प्रदेश असून या राज्यात सध्या 81,763 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.