Tuesday, September 17, 2024
Homeनगरमहिला रोजगार स्वयंरोजगारासाठी ‘इंदिरा महोत्सव’ मानबिंदू ठरणार - आ. थोरात

महिला रोजगार स्वयंरोजगारासाठी ‘इंदिरा महोत्सव’ मानबिंदू ठरणार – आ. थोरात

वीस हजार महिलांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

बचत गटातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून बचत गटाच्या उत्पादित मालांच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल असे सांगताना हा महोत्सव रोजगार व स्वयंरोजगारासाठी मानबिंदू ठरेल, असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथील इंदिरा महोत्सवात दुसर्‍या दिवशी झालेल्या वीस हजार महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. शोभा बच्छाव, भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, डॉ.जयश्री थोरात, दुर्गा तांबे, प्रभावती घोगरे, पौर्णिमा शिरसकर, केशव कांबळे, इंद्रजीत थोरात, सह्याद्री उद्योग समूहाचे विलास शिंदे, सत्यजीत हंगे, रणजीतसिंह देशमुख, संपत मस्के, घनश्याम शेलार, शरयू देशमुख, जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, राजीव गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक आणले. त्यामधून 33 टक्के आरक्षण महिलांना मिळाले. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे खर्‍याअर्थाने महिला सक्षमीकरण झाले. सर्व शासकीय योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, उंबरठा ओलांडून जगामध्ये येण्याची तयारी ठेवा.

तुमच्या उद्योग व्यवसायाला एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच मदत केली जाईल. या महोत्सवामध्ये दोन दिवसांमध्ये सुमारे 35 हजार महिला सहभागी झाल्या आहेत. तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे असून बचत गटातील महिलांनी काही उत्पादने केल्यास चांगले मार्केटिंग केले तर त्या कुटुंबाला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करताना गरीब महिलांच्या जीवनात सुख यावे यासाठी सर्वजण काम करत असल्याचे ते म्हणाले. खासदार डॉ.शोभा बच्छाव म्हणाल्या, संगमनेर तालुक्यातील महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादनांना प्राधान्य द्यावे. हायब्रीडमुळे आता आजार वाढले असून सेंद्रिय शेती उत्पादनांमधून मोठी संधी असल्याचे त्या म्हणाल्या. तर महिलांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून उपवास तपास करण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेती व्यवसायात महिलांना मोठी रोजगाराची संधी असल्याची त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डॉ. जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर अर्चना बालोडे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या