मुंबई | Mumbai
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे ही महाराष्ट्रातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन नेत्यांनी एकत्र यावे, अशी भावनिक साद घातली जात आहे. तर, दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये देखील अनुकूल दिसून येत आहेत. त्यातच, आता शिवसेना शिंदे गटातील नेते आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना-मनसे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठे वक्तव्य केलेय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी, असे विधान गजानन किर्तिकर यांनी केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजप प्रणित
यावेळी किर्तीकरांनी म्हटले की, शिवसेनेच्या मतात विभाजन होते आणि शिवसेनेचे नुकसान होते. हे कोणीही सांगेल. सध्या जे आहे हे त्रिभाजन आहे. दोन बंधू एकत्र आल्यावर त्यांचा तरी जनाधार त्यांना मिळेल. एकनाथ शिंदे यांना भाजपासोबत लढायचे आहे, कारण शिंदेंची शिवसेना भाजपाप्रणित आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसप्रणित आहे. आम्हाला भाजपाप्रणित किंवा काँग्रेसप्रणित शिवसेनाच्याऐवजी आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारी शिवसेना हवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची वाटत होती. मात्र, तसे होताना दिसत नाही, असे म्हणत गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालणाऱ्या शिवसेना पक्षावर घणाघाती टीका करत शिंदेंना घरचा अहेर दिलाय.
दोन्ही बंधुंकडे कॅडर आहे
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही इच्छा राज्यातील सर्व शिवसैनिकांची आहे. तशी इच्छा बाळासाहेबांचीही होती. दोन्ही बंधूकडे कॅडर आहे, फक्त एवढेच आहे की त्यांचा जनाधार तेवढा राहिला नाही. बाळासाहेबांच्या वेळेला जो जनाधार होता तो आता राहिला नाही. पण कॅडर आहे. आणि बाळासाहेबांच्या पासून शिवसेनेत नेतृत्व करणारे हे आमचे दोन युवा नेते. त्यांनी एकत्र यावे ही केवळ माझीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आंकाक्षा आहे. आम्ही केवळ इच्छाच व्यक्त करतो. त्यांनी एकत्र यावे.
तरच ठाकरे ब्रँड टिकेल
राज आणि उध्दव एकत्र आले तरच ठाकरे ब्रँड टिकेल. शिवसेनेचे विभाजन झाल्याचा गैरफायदा राजकारणात घेतला गेला. त्यासाठी ठाकरे ब्रँड पुन्हा आवतरला पाहिजे. अजूनही जुने शिवसैनिक आहेत. दोन ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या मागे राज्यातील शिवसैनिक उभे राहतील, असे कीर्तिकर म्हणाले. काँग्रेसची साथ उद्धव ठाकरेंनी सोडायलाच हवी. आणि राज ठाकरे भाजपसोबत गेलेच नाही कधी. भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. तेवढे ते हुशार आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये, कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहे हे त्यांना माहीत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा