शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल. सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक होता परंतु आता काय स्थिती झाली व कशामुळे झाली याचा जादा विचार न करता झालेल्या चुका दुरुस्त करा. आम्ही या सहकाररुपी वटवृक्षाला पाणी घातले, तुम्ही मन घाला असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
शिर्डीत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीने 8 व 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यपाल बागडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.काशिनाथ दाते, सहकार विभागाचे अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य मल्टीस्टेट संस्थांचे अध्यक्ष सुरेश वाबळे, कर्नाटकचे आ.शशिकला जोल्ले, रंजीत हेत्तीयार, विदेशी शिष्टमंडळातील नेनिता मलबस, फिलिपीन्सचे नाम्पि व्हिजेल, सॅली जॉन बोटेन्मण, पलमूस हेवांगे, मॉरिशस येथील जेम्स व्हीनस्लो, फेरॉन मॅरी म्यॅली जेनी, डक पेट्रिक केविन, नेपाळ येथील शिवजी सपकोटा, चंद्रप्रसाद ढाकला आदींसह राज्यातील डॉ. संजय होलम, उदय जोशी, सतीश मराठे, राजश्री पाटील, शैलेश कोतुरे, शरद जरे, संभाजी निकम, महेश कदम, संतोष बिडवई, शरद जाधव, जवाहरलाल छाबडा, रवींद्र भोसले, भास्कर बांगर, धनंजय तांबेकर, वासुदेव काळे, शिवाजी कपाळे, कडूभाऊ काळे, रवींद्र कानडे आदींसह राज्यातील 8 ते 10 हजार पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. व्यासपीठावर सहकार दिंडीचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, सहकारी चळवळीला बदनाम करण्याचे काम काही लोकांनी केले. ज्या ठिकाणी ठेवींचे व्याज कमी त्याठिकाणी ठेवींच्या परतीची हमी, ज्या ठिकाणी ठेवींचा दर जास्त त्या ठिकाणी ठेवी परास्त असा घणाघात त्यांनी केला. नवनवीन उपक्रम करून ज्या संस्था बिघडल्या त्या चांगल्या केल्या पाहिजेत. संस्था लयास जात असेल तर तिला वाचवायला हवं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ सहकारातली केलेली ही कल्पना आता राहिली नसल्याचे खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील पतसंस्था वाढीमध्ये काका कोयटे यांचे योगदान आहे. अनेक लोक सहकारावर मोठे झाले मात्र ते विसरून गेले. ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण व्हायला पाहिजे. तरच ठेवीदार सहकारी संस्थेत पैसे गुंतवतील. सहकारी कायद्यात बदल झाला पाहिजे. श्रद्धा आणि सबुरीने काम करा, असे सुतोवाच करत सहकार खात्याने राज्यातील ज्या सक्षम पतसंस्था आहे त्यांना शेतमाल साठवणुकीसाठी गोडाऊन उभे करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, सहकार परिषदेसाठी आठ देशातील प्रतिनिधी उपस्थित राहिले आहे. काका कोयटे यांनी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून चळवळ पुढे नेऊन सहकारी संस्थांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही सहकार चळवळीतूनच नेतृत्व पुढे आले आहे. राजकारण आणि सहकारी संस्था एकत्र आणता येत नाही. सहकाराला उज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी ठोस नियमावली आखण्याची गरज आहे. सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार कट्टीबद्ध असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, सहकारातील नैराश्याचे वातावरण दूर व्हावे या भावनेने आम्ही राज्यात साडेतीन हजार किमी चा प्रवास सहकार दिंडीच्या माध्यमातून केला. जेव्हा जेव्हा राज्यातील पतसंस्थेवर संकटे आली त्यावेळी ना. विखे पाटील धावून आले. ना. विखे पाटील हे पतसंस्था चळवळीचे संकटमोचक आहे. आमचा आक्रोश सहकार खात्याने ऐकावा, राज्यात 16 हजार पतसंस्था असून 2 कोटी 7 लाख सदस्य आहे. राज्यातील दीड कोटी कुटुंबांवर आमच्या चळवळीचा दैनंदिन संबंध आहे. पतसंस्था हाच आमचा ध्यास आहे. सर्व देशात सहकार फेडरेशन मजबूत आहे. जगातील सर्वात चांगली सहकारी चळवळ कोरियात आहे. पतसंस्था सदृढ होण्यामागे नियंत्रण महत्त्वाचे असते. पतसंस्थेच्या ठेवींना संरक्षण मिळावे ही आमची प्रमुख मागणी आहे. साईबाबांच्या शिर्डीत जागतिक स्वरूपाची लायब्ररी उभारावी, ज्यामध्ये सर्व सहकारी पुस्तकांचा समावेश असेल अशी अपेक्षा काका कोयटे यांनी व्यक्त केली. यावेळी राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, डॉ. के.वाय.गाडेकर, साहेबराव निधाने, डॉ. स्वाधीन गाडेकर, तसेच राज्यातून आलेले पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.