आज १५ जून, जागतिक मल्लखांब दिवस. कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे ‘मल्लखांब’ खेळाचे वर्णन केले जाते. मल्लखांब हा अस्सल मराठमोळा व्यायाम व क्रीडाप्रकार आहे.
मल्लखांब या प्राचीन व शरीर पिळदार बनवणाऱ्या खेळाला इतर सर्वच खेळांचे पूरक मानले जाते. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. मल्लखांबावरील कसरतींमुळे शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळता, संतुलन, साहस इ. गुण वाढीस लागतात.
मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे.
ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली.
मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना २९ जानेवारी १९८१ रोजी उज्जैन येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडेरेशन (regd.) इंडिया या नावाने ओळखले जाते. आजपर्यंत भारतातील २९ राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झाली आहे. दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते.
मल्लखांबामुळे अनेक शारिरीक फायदे होतात. मल्लखांबाला तेल लावले असल्याने शरीराचे सतत घर्षण त्या खांबाला होते आणि उत्तमरित्या आपल्या शरीराला तेलाची मालीष होते. यकृत, प्लिहा, तसच अंतरिंद्रियही कार्यक्षम राहातात. उलट-सुलट वेगवान हालचाली झाल्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण, या शरीरातल्या व्यवस्था कार्यक्षम राहातात तसेच अतिरीक्त वाढलेली चरबी, सुटलेले पोट, मेद, कमी होते.
आपल्या हातापायांचे पंजे, मांडया, पोटऱ्या, दंड, खांदे, यांच्या आतल्या संस्था फार कार्यक्षम होतात तसेच पोटाचे स्नायु, बरगडया, पाठीचा कणा बळकट होण्यास मदत मिळते. मल्लखांबामुळे फक्त शारीरीक विकासच नव्हें तर मानसिक स्वास्थ्य मल्लखांबामुळे उत्तम राहाण्यास मदत मिळते.