नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट (IPL) स्पर्धेच्या साखळी फेरीच्या सामन्यांचा थरार आटोपला असून, आजपासून (गुरुवार) उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना मुल्लानपुर येथील महाराजा यादवेंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. बंगळूरु संघाचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे तर पंजाब किंग्ज संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे असणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत ३२ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास पंजाब किंग्जने १७ तसेच बंगळूरुने १५ सामन्यात विजय संपादन केला आहे. आयपीएल २०२५ मध्ये साखळी फेरीत (Chain Round) दोन्ही संघांमध्ये २ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही संघांनी १-१ विजय संपादन केला आहे. या सामन्यात विजय संपादन करणारा संघ थेट अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित करणार आहे. तर पराभूत संघाला क्वालिफायर २ मध्ये आणखी एक संधी मिळणार आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये पंजाब किंग्ज संघाने २०१४ मध्ये प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला होता. मात्र, कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द पराभव स्वीकारावा लागल्याने पंजाब किंग्ज संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले होते. दुसरीकडे बंगळूरु संघाला आयपीएल २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. बंगळूरु संघाने आयपीएल २००९, २०१११, २०१६ अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या अंतिम सामन्यात विजय संपादन करून इतिहास रचण्यासाठी बंगळूरु सज्ज असणार आहे.