नाशिक | प्रतिनिधी
शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अंडा-भुर्जीच्या गाड्या, फळ विक्रेते व रस्त्यावर व्यापाऱ्यांची वाढती गर्दी यामुळे वाहतूक कोंडी व अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी (दि.१२) महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने कारवाई करण्याची तंबी दिली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, अति. आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी तसेच आरटीओ, महामार्ग प्राधिकरण आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नाशिकसारख्या शहरात शिस्तीचा अभाव सहन केला जाणार नाही, असे आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले.
यावेळी आ. फरांदे यांनी द्वारका सर्कल ते अय्यप्पा मंदिराकडे जाणारा सर्विसरोड अतिक्रमणमुक्त करावे, द्वारका सर्कल ते नाशिक पुणे रोडकडे जाताना सर्कलवरच अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड असून खरबंदा पार्क ते द्वारका चौक भागात अनधिकृत टपऱ्या, भेळभत्ताची दुकाने थेट रस्त्यावर आले आहे, त्यांना शिस्त लावण्याता यावी, येथील सर्विसरोडवरील फळांचे दुकाने, अंडाभुर्जीच्या गाड्या व इतर गाड्या त्वरित हटविण्यात यावे, द्वारका सर्कलवरील सिग्नल यंत्रणा सुरू करावी, येथे वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवावे, सारडा सर्कल परिसर अतिक्रमणमुक्त करावा,
तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशनला लागून जे वाईन शॉप आहे तिथे बऱ्याच टू व्हीलर आणि चारचाकी दारू घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती त्वरित दूर करण्यात यावी. मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या समोरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी काढले होते. तेथे पुन्हा हळूहळू अतिक्रमण होत आहे, त्याकडे देखील लक्ष देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




